एका रात्रीत जनतेमध्ये भाजपबद्दल उत्साह निर्माण झालेला नाही
खुशीनगर – लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान बनण्यापासून नरेंद्र मोदींना कुठलीच शक्ती रोखू शकत नाही, असा दावा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केला.
मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत अशी प्रत्येक जागरूक मतदाराची इच्छा आहे. एका रात्रीत जनतेच्या मनात भाजपबद्दल उत्साह निर्माण झालेला नाही. त्यासाठी मोदी सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न कारणीभूत आहेत, असे योगी येथील सभेत बोलताना म्हणाले. कॉंग्रेसच्या राजवटीत देशातील 270 हून अधिक जिल्हे नक्षलवाद, दहशतवाद किंवा जहालवादाने प्रभावित होते. त्यावेळी आपले जवान आणि नागरिक मारले जात होते. पाकिस्तानकडून आपल्या जवानांचा शिरच्छेद केला जात होता. चीन आपल्या सीमेत घुसत होता. मात्र, ती स्थिती आता बदलली आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यावर देशाच्या भूमीतून नक्षलवाद, दहशतवाद आणि जहालवादाचा नायनाट होईल, असा दावाही त्यांनी केला.