रायचूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवण्याचा निर्णय देशातील जनतेने घेतला असल्याचा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात कॉंग्रेस सरकार स्थापन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कर्नाटकातील रायचूर आणि चिक्कोडीमध्ये राहुल यांच्या सभा झाल्या. त्या सभांच्या माध्यमातून त्यांनी मोदींवरील शाब्दिक हल्लाबोल कायम ठेवला. देशभरात भाजपच्या विरोधात लढणाऱ्यांना विजयी करण्याचे जनतेने ठरवले आहे. गुजरातचा दौरा करून मी येथे आलो. गुजरातमध्ये कॉंग्रेसला अनुकूल अंडरकरंट आहे. गुजरातसाठी मोदींनी काहीच केले नसल्याचे तेथील जनता सांगते. मोठ्या उद्योगांना आमच्या लाखों एकर जमिनी देण्यात आल्याचा आक्रोश तेथील जनता करत आहे, असे राहुल म्हणाले. दरम्यान, रायचूरमधील सभेला राहुल यांच्या समवेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हेही उपस्थित होते. स्पष्ट बहुमत मिळूनही मोदींनी देशातील जनतेची फसवणूक केली. नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून त्यांनी देशाचे नुकसान केले. माझ्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नेता देशात नसल्याचे मोदींना वाटते. मात्र, देशाचा चांगला विकास करू शकणारे अनेक नेते देशात असल्याचे मी सिद्ध करू शकतो, अशा शब्दांत चंद्राबाबूंनी मोदींना आव्हान दिले.