मोरगाव (वार्ताहर)- उन्हाळ्याच्या सुट्ट्या होऊनही अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे भाविक व पर्यटकांचा शुकशुकाट जाणवत आहे. तप्त ऊन व राज्यात असलेल्या दुष्काळाचे सावट, निवडणूक रणधुमाळी आदी कारणांमुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्री भाविक व पर्यटकांनी पाठ फिरवले असल्याचे चित्र दिसत आहे.
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे अष्टविनायकातील पहिला गणपती आहे. अष्टविनायक यात्रेची सुरुवात व शेवट येथीलच करतात. यामुळे राज्यभरातून असंख्य भाविक व पर्यट्क मोरगाव येथे उन्हाळी सुट्ट्या, दीपावली, चतुर्थी व इतर सुट्टीच्या दिवशी येत असतात. वर्षभर येणाऱ्या भाविकांच्या संख्येवरच येथील व्यावसायिकांचे आर्थिक गणित ठरत असते.
दर उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने भक्त अष्टविनायक यात्रा किंवा वन डे ट्रीपच्या निमित्ताने मोरगाव येथे येत असतात. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हॉटेल, टी स्टॉल, खेळणी, पार्किंग, भक्तनिवास, लॉज, श्रींचे फोटो व पेढे विक्रीची दुकाने, फ्रृट स्टॉल आदी व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
मात्र यंदा उन्हाळी सुट्टी सुरू होऊनही भाविक व पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे. उन्हाळ्याची सुट्टी व येणारे पर्यटकांची संख्या लक्षात घेता येथील दुकान व्यावसायिकांनी भरगच्च कच्चा व इतर माल भरून ठेवलेला आहे. मात्र, सुट्ट्या सुरु होऊनही गर्दी तुरळक जाणवत आहे.
दोन दिवस गर्दीचा
केवळ शनिवार व रविवार या दिवशी गर्दी होत आहे. मात्र, एरवी सोमवार ते शुक्रवारपर्यंत तुरळकच गर्दी जाणवत आहे. सध्या बारामती तालुक्यासह राज्यात असलेला दुष्काळ, पाण्याची भीषण टंचाई, लोकसभा निवडणूक रणधुमाळी आदी कारणांमुळे अष्टविनायक तीर्थक्षेत्री भाविकांनी पाठ फिरवली असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.