VBA Manifesto| आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच कॉँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर काल १४ एप्रिल रोजी भाजपकडून लोकसभा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यातच महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या वंचित बहुजन आघाडीने बाहेर पडत स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. एनआरसी, सीएए कायदा असंवैधानिक असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. या कायद्यांमुळे हिंदूतील भटक्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. या लोकांच्या अधिवासाची कोणतीच नोंद नसल्याने त्यांचं नागरिकत्व धोक्यात येईल. भारतीय जनता पक्ष येथील हिंदू मतदारांना फसवत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
समान नागरी कायदा हा संविधानाला धोका नाही, पण हा आरएसएसला धोका आहे. तसेच हा तोटा आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांचा नाही, तर धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या पक्षांना आहे. भाजप, आरएसएस आणि बजरंग दल यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होणार असल्याचा टोला ॲड. आंबेडकर यांनी आरएसएसला लगावला आहे.
शेतीवर आधारीत उद्योगांना चालना देणार
तसेच शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील दिली जाईल, असेही जाहिरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. शिक्षणाच्या धोरणाला कथित शिक्षण महर्षींच्या कैदेतून मुक्त करू. शिक्षणासाठीची तरतूद 3 टक्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत वाढवणार. सार्वजनिक क्षेत्रात खाजगी गुंतवणूक आणि विक्रीला थांबवणार. शेतीवर आधारीत उद्योगांना चालना देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
नवीन औद्योगिक धोरण राबवणार
कापूस, सोयाबीनला बाजारभाव मिळत नसल्याने सत्तेत आलो तर कापसाला किमान 9 हजार तर सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव देऊ. शेतीला उद्योगाचा दर्जा कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही या जाहीरनाम्यामधून देण्यात आले आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे, तिला आम्ही थांबवणार आहोत. नवीन औद्योगिक धोरण राबवणार असल्याचे आश्वासन देखील यातून देण्यात आले आहे.
तसेच कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय देखील घेण्यात आला आहे. ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे, ही मागणी देखील आम्ही करत आहोत. आम्ही सरकारमध्ये आल्यावर एससी, एसटी यांना जे आरक्षण मिळत आहे, त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा:
किरण सामंत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; म्हणाले,”फडणवीस जो न्याय…”