नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर – संस्कार, संस्कृती, रूढी, परंपरा जपणारा लोक कलावंत खऱ्या अर्थाने असून रात्रंदिवस जनतेला आनंद देण्यासाठी मेहनत घेत असतो. या लोक कलावंतांना राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामीण व शहरी कलावंतांचे नेते बाळासाहेब सरवदे यांनी केले.
रविवार (दि.३१ मार्च) रोजी जंक्शन ता इंदापूर येथे तालुक्यातील सर्व लोक कलावंताची बैठक बाळासाहेब सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना बाळासाहेब सरवदे यांनी लोक कलावंताच्या अडचणी आणि त्यावर उपाय काय करावे लागतील? या विषयी त्यांनी भूमिका मांडली.
लोक कलावंत जो लोकांमध्ये जावून समाज जागृती ‘लोकांचे प्रबोधन’ मनोरंजन करतो. त्याला कलेच्या माध्यमातून प्रपंच चालविण्यापूरता पैसा मिळतो. त्यामूळे लोक कलावंताचा आर्थिक स्तर आहे त्याच स्तरावर आहे. त्यामूळे त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. प्रसंगी त्यांची उपासमार होते त्यामुळे लोक कलावंत जगला पाहिजे. या गोष्टीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे सरवदे यांनी सांगितले.
कलावंतासाठी ज्या योजना आहेत त्या योजनापासून ग्रामीण कलाकार वंचित आहे. त्यामुळे शासनाकडून ग्रामीण भागातील कलावंताचा सर्वे करून त्यांना सरकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत बाळासाहेब सरवदे यांनी या बैठकीत केले.
यावेळी जेष्ठ नेते कवि सु.ग साबळे लोकगायक विजय सरतापे, अभिनेते नेताजी लोंढे, तमाशा कलावंत कुमार साठे, कवि गायक भिमराव चितारे, गायक दिलीप भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. पुढील सात एप्रिल रोजीच्या बैठकीत लोककलावंताची नवीन संघटना इंदापूर तालुक्यात सुरु करावी, असे सर्वांच्या विचारा अंती ठरविण्यात आले. यावेळी इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य लोक कलावंत उपस्थित होते.या बैठकीचे संयोजन बेंजो मास्तर नाथा सरतापे यांनी केले.