नगर (प्रतिनिधी) – राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या पुण्यस्मृतीनिमित्त गुरूवारी नगर शहरातून सकाळी भव्य शांतीमार्च काढण्यात आला. नवीपेठ जैन स्थांनकापासून सुरू झालेल्या शांती मार्चमध्ये महिला, पुरूष, युवक, युवती, मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांतीचा संदेश देणारा जैन ध्वज भाविकांच्या हाती होता. जय आनंद, हमारे गुरू आनंद गुरू असा जयघोष भाविकांनी केला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही शांतीमार्च मध्ये सहभाग नोंदवला.
नवीपेठ जैन स्थानक, घास गल्ली, कापड बाजार, दाळ मंडई, आडते बाजार, गंजबाजार, बुरूड गल्ली, बंगाल चौकी, मार्केट यार्ड, सहकार सभागृह मार्गे शांतीमार्च आनंदधाम येथे दाखल झाला. तत्पूर्वी मार्केट यार्ड चौकात आचार्यश्रींचे जन्मस्थळ शिराळ चिचोंडी येथून आलेली पायी दिंडी शांतीमार्च मध्ये सहभागी झाली.
आनंदधाम येथे झालेल्या गुरू गुणानुवाद सभेस महाराष्ट्र प्रवतर्क कुंदनऋषीजी महाराज, प्रबुध्द विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज, राष्ट्रसंत कमलेशमुनी म.सा, पूज्य आलोकऋषीजी महाराज आदिठाणा, महासतीजी महाराष्ट्र प्रवर्तिनी डॉ. ज्ञानप्रभाजी म.सा., उपप्रवर्तिनी डॉ.प्रियदर्शनाजी म.सा., पूज्य पुष्पकंवरजी म.सा.
पूज्य डॉ. मधुबालाजी म.सा., पूज्य त्रिशलाकंवरजी म.सा., पूज्य सत्यप्रभाजी म.सा., पूज्य दिव्यदर्शनाजी म.सा., पूज्य सम्यकदर्शनाजी म.सा., पूज्य विश्वदर्शनाजी म.सा., पूज्य उदयप्रभाजी म.सा. , पूज्य अर्चनाजी म.सा., पूज्य चंद्रकलाजी म.सा. आदी ठाणा आदी साधू साध्वीजी उपस्थित होते. नगरच्या पावनभुमीत जन्मलेल्या आचार्यश्रींनी संयमी जीवनाचा आदर्श निर्माण केला. त्यांनी कायम मानवसेवेची शिकवण दिली. दिनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानली.
अनेक भाषांवर प्रभुत्व, धर्मग्रथांचा गाढा अभ्यास करून त्यांनी आपल्या प्रवचनांतून मानवी जीवनाचे सार यथार्थपणे मांडले. जैन धर्माचा मानवी कल्याणाचा, समस्त जीवांच्या कल्याणाचा महान विचार त्यांनी दिला. आताच्या काळात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, जागतिक शांततेसाठी आचार्यश्रींची शिकवण लाखमोलाची आणि अनुकरणीय आहे अशा भावना साधूसाध्वीजींनी व्यक्त केल्या.