पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका सर्वसामान्य उमेदवाराविरोधात अजित पवार यांना उमेदवार आयात करावा लागला, अशी टीका खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी केली. उमदेवार आयात करण्याची वेळ यावी, हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचा विजय आहे, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले.
शिवसेनेचे नेते शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अधिकृतरीत्या प्रवेश केला. याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली.
त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. केवळ सेलिब्रेटी म्हणून हिणवू नका. एक खासदार म्हणून गेल्या पाच वर्षांत शिरुर लोकसभा मतदारसंघात १९ हजार ५०० कोटींचे विकासकामे केली असल्याचे कोल्हे म्हणाले.
या कार्यक्रमात कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी अवाक्षरही काढण्यात आले नाही. येथील परिसर बिबट्याच्या दहशतीत आहेत. वीज व तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न समोर आहे. अशी स्थिती असताना अजित पवार यांच्याकडून पंतप्रधानावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत, हे आश्चर्यकारक आहे. खासदार असताना गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती कोल्हे यांनी या वेळी दिली.
मात्र, त्यापूर्वी ही कामे का होऊ शकली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अजित पवार ,कोल्हे यांना मीच खासदारची संधी दिल्याचे म्हणाले, याबाबत बोलताना कोल्हे म्हणाले, मला राजकारणात संधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे. आता अजित पवार यांना उमेदवारीसाठी वारंवार दिल्ली दौरा करावा लागतो, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.