मुंबई- अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवस अनेक मोठ्या घडामोडींमुळे गाजला. विधिमंडळ परिसरात मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर सभागृहात भाजप आमदार आशिष शेलार व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात हमरीतुमरी झाली. या दोन्ही घटनांमुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शुक्रवारी विधानसभेत हे सभागृह किती वेळ चालले यावर प्रश्न उपस्थित केला. विरोधी पक्षांनी घसा कितीही फोडला व कितीही कंठशोष केला, तरी सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही. सरकार एका मस्तीत आहे, असे ते म्हणाले. सद्यस्थितीत विधानसभेचा वापर वैयक्तिक हिशेब चुकते करण्यासाठी केला जात आहे. हे प्रथमच घडत आहे. आपल्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून बसतो, एखादा इथे येतो, कुणावर तरी आरोप करतो आणि आपण वरून आदेश देऊन टाकता. याची एसआयटी लावा, त्याची चौकशी लावा, हे प्रकार आम्ही केव्हाच बघितले नाही, असे ते म्हणाले. हवेच कशाला असे अधिवेशन? संपवूनच टाका ना, असेही भास्कर जाधव यावेळी जोर देत म्हणाले.
भास्कर जाधव यांच्या या टीकेचा भाजप नेते आशिष शेलार यांनी समाचार घेतला. विरोधी पक्षांकडून सध्या सभागृह किती वेळ चालले याचा आव आणला जात आहे. पण त्यांचे सरकार असताना किती दिवस अधिवेशन घेतले? किती दिवस सभागृह चालवले? विरोधक कोविडचे कारण देत होते. पण तेव्हा संसदही सुरू होती. अन्य राज्यांतील विधानसभा सुरू होत्या. पण आपले कामकाज बंद होते, असे ते म्हणाले.
तेव्हा लोकशाही संकटात सापडली नव्हती का?
विरोधी पक्ष सत्तेत असताना सभागृह २-२ दिवस चालले. त्यावेळी लोकशाही संकटात सापडली नव्हती का? दुसऱ्याकडे बोट दाखवताना ४ बोटे आपल्याकडे येतात. त्यावेळी लोकशाही धोक्यात आली नव्हती. त्यावेळी विधेयकांवर चर्चा झाली नव्हती, लक्षवेधी झाली नव्हती, प्रश्न नव्हते घेतले. मी जे बोलतोय ते रेकॉर्डवरचे बोलतोय. मी पसरट बोलत नाही, मी चार-चार मुद्दे पुन्हा पुन्हा मांडत नाही. आपण केलेली चर्चा उत्तम, समोरच्याने केलेली चर्चा त्रासदायक. हे चालणार नाही. तू बघायला येतो का? हा काय नाचायचा स्टेज आहे का? नाचता येईना अंगण वाकडे अशी तुझी स्थिती आहे, असे आशिष शेलार यावेळी भास्कर जाधवांना प्रत्युत्तर देताना म्हणाले.