नवी दिल्ली – भारतातील बिबट्यांची अंदाजे संख्या 13,874 इतकी असून 2018 मध्ये केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ती 12,852 इतकी होती, म्हणजेच भारतातील बिबट्यांच्या संख्येत सुमारे एक हजारांची वाढ झाली असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी आज भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल जारी केला.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वन विभागाच्या सहकार्याने व्याघ्र श्रेणीतील राज्यांमध्ये चतुर्वार्षिक “वाघ, सह-भक्षक, शिकार आणि त्यांचे अधिवास” या अभ्यासाचा भाग म्हणून बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठीच्या सर्वेक्षणाची पाचवी फेरी नुकतीच पूर्ण केली.
मध्य भारतात बिबट्यांच्या संख्येत स्थिर किंवा किंचित वाढ दिसून येते, शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या पठारी भागात मात्र घट दिसून येते आहे. जर आपण 2018 आणि 2022 मध्ये संपूर्ण भारतात केलेल्या सर्वेक्षणाच्या क्षेत्राचा विचार केला तर बिबट्यांच्या संख्येत 1.08% वार्षिक वाढ दिसून येते आहे.
बिबट्यांची देशातील सर्वात जास्त संख्या मध्य प्रदेशात – 3907 आहे, त्यानंतर महाराष्ट्र, 1985, कर्नाटक – 1,879, तमिळनाडू – 1,070, यांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक बिबट्या असणारे व्याघ्र प्रकल्प किंवा स्थळ म्हणजे नागराजुनसागर श्रीशैलम (आंध्र प्रदेश), त्यानंतर पन्ना (मध्य प्रदेश), आणि सातपुडा (मध्य प्रदेश) हे होय.
सर्वेक्षणाच्या पाचव्या फेरीत 18 व्याघ्र राज्यांमधील वाघांच्या अधिवासांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, ज्यामध्ये चार प्रमुख व्याघ्र संवर्धन भूदृश्यांचा समावेश आहे. मांसभक्षक प्राण्यांच्या पाऊलखुणा आणि शिकारीसाठी आवश्यक विपुलतेचा अंदाज लावण्यासाठी 6,41,449 किलोमीटर अंतरावरील प्रदेशाचे पायी सर्वेक्षण करण्यात आले.