सातारा, (प्रतिनिधी) – गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेच्या आंधळी (ता. माण) येथील धरणात आलेल्या पाण्याचे पूजन रविवारी (दि. 25) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी माण आणि खटाव तालुक्यांमध्ये लगबग सुरू आहे. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस काय भाष्य करणार, याची उत्कंठा वाढली आहे.
या पाण्याचे पूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, काही कारणांमुळे त्याचा राज्याचा दौरा रद्द झाला. त्यामुळे रविवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंधळी धरणात जलपूजन करण्यात येणार आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे माण तालुक्यात पाणी आले आहे. माण आणि खटाव तालुक्यांना फायदेशीर ठरणार्या पाणी योजनांना देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला आहे. पाण्याचे फेरवाटप झाल्यानंतर टेंभू योजनेतूनही अडीच टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यामुळे मायणी, कलेढोण आणि कुकुडवाडसह 42 गावांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औंधसह 16 गावांच्या पाणीप्रश्नाबाबतही रविवारी निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत दावे, प्रतिदावे सुरू आहेत. यावरून आरोप, प्रत्यारोपही होत आहेत. राजकीय वातावरण तापलेले असताना या दोन मतदारसंघांबाबत फडणवीस काय भाष्य करणार याची उत्कंठा वाढली आहे.
आ. गोरेंनी मतदारसंघ पिंजून काढला
आंधळी धरणातील जलपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आ. गोरे यांनी माण-खटाव विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला. त्यांच्या संपर्क दौर्याला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळाला.