Sharad Pawar : अजित पवार यांच्यासह 40 आमदारांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करण्यात आला. याप्रकरणी निवडणूक आयोगाने खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निर्णय दिला. निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शरद पवारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी सुनावणी होणार आहे.
ही सुनावणी न्या. सूर्यकांत, न्या. दीपंकर दत्ता आणि न्या. केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी 16 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो, असे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची तातडीने यादी करण्याचे मान्य केले होते.
राहुल नार्वेकरांचा निर्णय
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी रोजी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे जाहीर केले आणि गटाला पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह दिले. तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला होता.
शरद पवार गटाच्या याचिकेत काय म्हंटले आहे ?
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची शरद पवार यांची मागणी करण्यात आली आहे. याबाबतची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
अजित पवार गटाकडून कॅव्हेट दाखल
दुसरीकडे अजित पवार गटाने अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.