Farmer Protest| शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला ‘दिल्ली मार्च’ची घोषणा केली होती. त्यामुळे मंगळवारी हरियाणा-पंजाब सीमेवर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाच्या घटना समोर आल्या. हरियाणातील शंभू बॉर्डर आणि जिंद बॉर्डरवर पोलीस आणि आंदोलक शेतकरी आमनेसामने आले, एकीकडे पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्याने शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. या आंदोलनाचा परिणाम उत्तर प्रदेशातील दिल्लीच्या सीमावर्ती शहर नोएडामध्येही दिसून आला.
नोएडातही शेतकरी आंदोलनाचा परिणाम –
मंगळवारी शेतकऱ्यांच्या दिल्लीपर्यंतच्या मोर्चाचा परिणाम नोएडामध्येही दिसून आला. येथे मुख्य रस्त्यांवर, विशेषत: दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अनेक किलोमीटर लांब जाम होता. नोएडा कालिंदी कुंज सीमेवर 5 किलोमीटरहून अधिक लांब जाम असल्याचे समोर आले आहे. त्याचवेळी महामाया ते नोएडा गेटपर्यंत दोन किलोमीटर लांबीचा जाम होता.
कालिंदीकुंज यमुना पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा –
त्यामुळे कार्यालयातून घरी परतणाऱ्या नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कालिंदीकुंज यमुना पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कालिंदी कुंज ते महामाया उड्डाणपुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासून कालिंदी कुंज सीमेवर जाम कायम होता.
मंगळवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवले –
दुसरीकडे, शेतकरी संघटनांनी मंगळवारी आपली निदर्शने थांबवली आहेत. आता शेतकरी उद्या बुधवारी पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. मंगळवारी सायंकाळी शेतकरी संघटनांनी याबाबत घोषणा केली. आमचे सुमारे 100 लोक जखमी झाले पण तरीही आम्ही संयम राखला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
शंभू सीमेवर पोलिसांवर दगडफेक –
दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून शंभू सीमेवरील बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, आंदोलकांनी हरियाणा पोलिसांवर जोरदार दगडफेक केली, प्रत्युत्तर म्हणून हरियाणा पोलिसांनी पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे. हिंसाचार करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.