Arvind Kejriwal – केंद्रातील सर्व तपास संस्था मी एखादा दहशतवादी असल्यासारख्या माझ्या मागे लागल्या आहेत अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीतील द्वारका भागातील एका शाळेच्या पायाभरणी समारोह प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांच्या सरकारने केलेल्या कामगिरीची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
केजरीवाल म्हणाले की ते आम्हाला रोखण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे जास्त काम आम्ही करू. गेल्या काही दिवसांत त्यांनी मला थोपवण्यासाठी माझ्या विरोधात एवढे गुन्हे दाखल केलेत की जसे काही मी कोणी दहशतवादी आहे. त्यांनी (भाजप) सगळ्या तपास संस्था, सगळे पोलीस आणि सगळ्यांनाच माझ्या मागे सोडले.
इश्वराने या पृथ्वीवर प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या उद्देशाने पाठवले आहे. भाजपचा उद्देश खोट्या केसेस करून लोकांना त्रास देण्याचा आहे आणि देवाने मला मोफत वीज देण्यासाठी, शाळा बांधण्यासाठी, तुमच्यासाठी चांगली रूग्णालये तयार करण्यासाठी पाठवले आहे.
भाजपला लक्ष्य करताना ते पुढे म्हणाले की केजरीवाल चोर असल्याचे ते म्हणतात. मी दिल्लीकरांना वीज मोफत केली. पंजाबच्या लोकांनाहीती मोफत दिली. मात्र यांचे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात जेथे जेथे सरकारे आहेत तेथे वीज एवढी महाग का आहे हा माझा त्यांना प्रश्न आहे.
वीज मोफत देणारा चोर आहे की महागात वीज देणारा चोर आहे. मी दिल्ली आणि पंजाबमध्ये सगळ्यांचे उपचार मोफत केले आहे. चांगली रूग्णालये तयार केली आहेत, चांगले मोहल्ला क्लीनीक तयार केले आहेत. सगळ्यांच्या आरोग्य सुविधांची मोफत व्यवस्था करणारा चोर आहे की या सुविधा महाग करणारा चोर आहे?
दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांचा उल्लेख करून ते म्हणाले सिसोदिया यांनी गरिबांच्या मुलांसाठी सुंदर शाळा बनवल्या. त्यांना चांगले भविष्य दिले. मात्र यांची जेथे जेथे सरकारे आहेत तेथे ते शाळा बंद करत आहेत.
मुलांना खासगी शाळांमध्ये पाठवण्याखेरीज पालकांना पर्याय नाही. गरिबांच्या मुलांच्या चांगल्या शिक्षणाची सोय करणारा चोर आहे की त्यांच्या शाळा बंद करणारा चोर आहे असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.