लंडन – इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. इंग्लिश संघाला भारतात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला उद्या गुरुवार, 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबाद येथे होणार आहे.
दरम्यान, भारताला भारतात पराभूत करणे कठीण आहे परंतू यंदा इंग्लंडच्या संघाला पाच कसोटी सामन्यांची मालिका जिंकण्याची जास्त संधी आहे, असे मत इग्लंडचा माजी कसोटीपटू अलिस्टर कुक याने व्यक्त केले आहे.
पुढे कुक म्हणाला की, भारतीय कसोटी संघ पाहीला तर त्यात नवोदित खेळाडूंचा भरणा जास्त आहे. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे हे मलाही मान्य आहे परंतू मोठ्या स्तरावर दडपण कसे हाताळायचे हे अद्याप त्यांना शिकायचे आहे. त्यातच कर्णधार रोहित शर्मा याची कामगिरी सातत्यपूर्ण नाही. पहिल्या दोन्ही कसोटीत त्यांचा मुख्य फलंदाज विराट कोहलीही खेळणार नसल्याने इंग्लंड संघाने याच दोन कसोटींवर जास्त लक्ष केंद्रित केले तर ते मालिकेत आघाडी घेऊ शकतात व त्यानंतर तिनपैकी एकच सामना मालिका विजयासाठी त्यांना जिंकायचा असेल व त्याचे मोठे दडपण भारतीय संघावरच येइल, असेही कुक म्हणाला.
पहिल्या सामन्यासाठी इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी वरिष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही. खेळपट्टीचा विचार करता बेन स्टोक्सने अंतिम अकरामध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. याशिवाय हॅरी ब्रूकच्या जागी बेन फॉक्सला संधी मिळाली आहे.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन – जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), रेहान अहमद, टॉम हार्टली, जेक लीच आणि मार्क वुड.