महाराष्ट्रात राजकीय संघर्षावरून राजकीय पक्षांची आणि नेत्यांची कुरघोडीची आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच सामाजिकदृष्ट्या दोन महत्त्वाच्या विषयांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रातील 28 टक्के नागरिक नैराश्येत असल्याचा निष्कर्ष सरकारच्याच एका संस्थेने जाहीर केला असून त्याचवेळी दुसरीकडे राज्याला अंमलीपदार्थांचा विळखा बसल्याचेही समोर आले आहे. वाढते नैराश्य आणि अंमलीपदार्थांचा वापर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने एकमेकांवर कुरघोडी करण्यात दंग असलेले राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते या महत्त्वाच्या विषयाकडे कधी लक्ष देणार हे आता पाहावे लागेल. करोना महामारीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रासह जगात सर्वत्रच नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टेलीमानस हेल्पलाइन नावाची एक व्यवस्था उपलब्ध केली होती.
या हेल्पलाइनवर गेल्या काही कालावधीमध्ये जे विविध प्रकारचे फोन आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि मदत मागण्यासाठी आले आहेत त्यापैकी 28 टक्के लोक नैराश्याच्या गर्तेत असल्याचे समोर आले आहे. टेलीमानसवर दररोज येणार्या 137 फोनपैकी 38 लोक नैराश्याबाबतच विचारणा करत असतात. या हेल्पलाइनवर वर्षभरात आलेल्या 50 हजार फोनपैकी 15 हजारांच्या आसपास फोन फक्त नैराश्याबाबत होते ही बाब गांभीर्याने घेण्यासारखीच आहे. नैराश्यामुळे विशेषतः तरुण पिढी समस्याग्रस्त असतानाच या नैराश्यावर उपाय शोधण्याच्या नादात व्यसनाधीनताही वाढत आहे. याबाबतची आकडेवारीही याच कालावधीमध्ये समोर आली आहे. राज्यातील प्रमुख महानगरे तर अमलीपदार्थांच्या विळख्यात गेलीच आहेत. आता गावोगावीसुद्धा अंमलीपदार्थांचा व्यवहार आणि व्यापार सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये ज्या प्रमाणात अंमलीपदार्थ जप्त होत आहेत ते पाहता या विषयाचे गांभीर्य लक्षात यायला हरकत नाही.
ज्याअर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थ जप्त होत आहेत त्याअर्थी तेवढ्याच प्रमाणात या पदार्थांचा उपभोगही घेतला जात आहे. त्यांना मागणी असल्यामुळेच त्याच्या व्यापारातही वाढ झाली आहे. साहजिकच जरी सरकारी पातळीवर अंमलीपदार्थांच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात येत असली तरी ती कमीच पडत आहेत असेच दिसते. साहजिकच नैराश्याच्या गर्तेत गेलेली तरुणाई असो किंवा या नैराश्यामुळे अंमलीपदार्थांच्या आहारी गेलेले नागरिक असोत त्यांना सकारात्मक समुपदेशन करून आयुष्यात सर्व काही संपले नाही हे समजावून सांगण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्याप्रकारे नैराश्याचे हे वातावरण वाढण्यासाठी विविध कारणे जबाबदार आहेत त्यामध्ये बहुतेक वेळा नोकरीतील संघर्ष हेच महत्त्वाचे कारण समोर आले आहे. जी इतर कारणे आहेत त्यामध्ये परीक्षेतील यश आणि नातेसंबंध या अशा प्रकारचे अनेक विषय समोर दिसत आहेत.
आधुनिक जगात स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी सर्वांचीच धावाधाव सुरू आहे. आपलाच नंबर पहिला यावा यासाठी प्रत्येक जण जीवाचा आकांत करून धावत आहे आणि त्यामुळे त्याचा दुसरा नंबर जरी आला तरी तो नैराश्यात जाऊ शकतो. दुसरा नंबर ही चांगलाच असतो, हे समजून घेतले जात नाही अशी ही परिस्थिती आहे. कारण तुलनात्मक वातावरणामध्ये प्रत्येकाच्या मनातच निराश आणि नकारात्मक भावना तयार होत असतात. एखादी गोष्ट न मिळणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येणे म्हणजे तो काही आयुष्याचा पूर्णविराम नसतो. अजून कसून प्रयत्न करून आपल्याला हवे ते आपण साध्य करू शकतो, हे सर्व पातळीवर आता सर्वांच्याच मनात बिंबवण्याची गरज आहे. सरकारच्या या हेल्पलाइनमुळे नागरिकांमधील निराशा वाढत चालली आहे ही बाब जरी समोर आली असली तरी ही वाढती निराशा कमी करण्यासाठी काय केले जाणार आहे हे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण जर याबाबत वेळीच उपाय केले नाहीत तर निराशावादी लोकच आपोआप अंमलीपदार्थांच्या वापराकडे वळतात, ही साखळीही या निमित्ताने लक्षात घ्यावी लागेल. कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न करूनच सर्वसामान्य नागरिकांना या निराशेतून बाहेर काढावे लागणार आहे. कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबांमध्ये लहान मुलांच्या शाळेतील व्यवहारांपासून ते तरुण मुलाच्या कॉलेजमधील वागणुकीवरूनही निराशेचे वातावरण तयार होऊ शकते. जर कौटुंबिक पातळीवर योग्य समुपदेशन झाले आणि तेवढ्याच योग्यतेचे आणि क्षमतेचे समुपदेशन शैक्षणिक संस्थांच्या पातळीवर झाले तर नैराश्याच्या या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. टेलीमानस या हेल्पलाइनच्या निमित्ताने माणसांमधील नैराश्य वाढण्याची जी विविध कारणे समोर आली आहेत त्यांचाही प्राधान्यक्रमाने विचार करून ही कारणे त्या त्या पातळीवर कशी कमी होऊ शकतील ते पहावे लागणार आहे. आधुनिक काळातील स्पर्धात्मक जगामध्ये कोणी तरी यशस्वी होणार आणि कुणाला तरी अपयश मिळणार हे ठरूनच गेले आहे;
पण अपयश म्हणजे सर्व काही संपले असे नाही तर ती एक नवीन सुरुवात असू शकते याचाही प्रसार या निमित्ताने करावा लागणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटामध्ये जी सकारात्मकता दाखवण्यात आली आहे ती सर्वच पातळीवर अमलात आणणे सहज शक्य आहे. साहजिकच अशा प्रकारच्या चित्रपटांचे प्रदर्शन करून सकारात्मकता वाढवता येऊ शकते. सर्वसाधारण जीवन जगत असताना एखादा रस्ता बंद झाला तर त्याचवेळी दुसरा रस्ता उघडला जातो ही सामान्य गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. ‘और भी है राहे’ यासारखे सुविचार केवळ भिंतीवर लिहून ठेवण्यासाठी नाहीत तर ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठीच आहेत. समुपदेशनाचे काम करण्याची जबाबदारी असणार्या सर्वांनाच याचे भान ठेवून समाजात वाढत चाललेले नैराश्य कसे कमी होईल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. अंमलीपदार्थांच्या वापरावरील नियंत्रण सरकारी पातळीवर कठोर उपाय योजून प्रत्यक्षात येऊ शकेल; पण मानसिक आरोग्य जपण्यासाठी मात्र प्रत्येकालाच वैयक्तिक पातळीवर आपणहून प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी ‘और भी है राहे’ हा मंत्र लक्षात ठेवावा लागणार आहे. अपयशाला अनुभव मानून वाटचाल चालू ठेवली तर निराशा मनाच्या आसपासही दिसणार नाही.