नवी दिल्ली – देशभरात एकत्रित निवडणुकांची संकल्पना मांडणाऱ्या मोदी सरकारच्या वचनबद्धतेविषयी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते सरकार गंभीर असेल तर प्रथम जम्मू-काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
वन नेशन, वन इलेक्शनची संकल्पना मोदी सरकारने पुढे केली आहे. देशभरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा उद्देश त्यामागे आहे. मात्र, त्या संकल्पनेबाबत मोदी सरकार गंभीर असल्याविषयी उमर यांनी साशंकता व्यक्त केली.
जम्मू-काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका घेतल्या जाऊ शकत नसतील; तर देशभरात त्या घेण्याच्या कल्पना कशी काय केली जाऊ शकते, असा सवाल त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
उत्तरप्रदेश, बिहारसारख्या राज्यांत निवडणुकांवेळी सुरक्षा दलांची मोठी तैनाती आवश्यक असते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांत इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीला निर्णायक जनादेश मिळेल, असा विश्वासही उमर यांनी व्यक्त केला. त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचाही इंडियामध्ये सहभाग आहे. त्या आघाडीतील पीडीपी आणि कॉंग्रेसचाही जम्मू-काश्मीरात राजकीय प्रभाव आहे.