नवी दिल्ली – जर बहुजन समाज पक्ष स्वतःला भाजपविरोधी मानत असेल तर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या घटकांमध्ये सामील होण्याचा विचार केला पाहिजे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटले आहे.
तिवारी म्हणाले की, आम्ही त्या सर्व पक्षांना इंडिया आघाडीत येण्यास सांगितले आहे जे भारतीय जनता पक्षाला प्रामाणिकपणे विरोध करतात. जर बसपा भाजपविरोधी आहेत, तर त्यांनी इंडिया आघाडीतील सर्व घटकांशी संपर्क साधावा. आणि मोदीविरोधी गटात सामील व्हावे असे तिवारी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हंटले. भाजपला विरोध करण्याची त्यांची हिंमत नसेल तर ठीक आहे, असे असेही ते यावेळी म्हणाले.
अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपासोबतच्या समीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस नेते म्हणाले, आम्ही समाजवादी पक्षासोबत दोन बैठका घेतल्या आहेत. आम्ही जागांवर चर्चा करत आहोत.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा सामना करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या किमान २८ राजकीय पक्षांची युती असलेल्या इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि सपा यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. बसपाच्या प्रमुख मायावती अद्याप कोणत्याही युतीमध्ये सामील झालेल्या नाहीत, त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूका लढवण्याची घोषणा केली आहे.