पिंपरी – पुणे परिमंडलामध्ये वाढती ग्राहकसंख्या व विजेची मागणी पाहता सन २०५० पर्यंत दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी २२० केव्हीचे १४ तर १३२ केव्हीचे ३ अशा १७ अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रांची आवश्यकता असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहर व आसपासच्या परिसरातील चऱ्होली, ताथवडे, मोशी, म्हाळुंगे, गहुंजे, नेरे, हिंजवडी, सेक्टर १२ प्राधीकरण येथील अतिउच्चदाब उपकेंद्रांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली. यातील चऱ्होली व सफारी पार्क येथील अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच भोसरी सेन्चुरी एन्का अतिउच्चदाब उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याबाबत महापारेषणकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
पुणे परिमंडलामधील विविध कामांचा ‘प्रकाशदूत’ सभागृहात आढावा बैठक झाली. या वेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त), ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) उपस्थित होते.
राजेंद्र पवार म्हणाले की, पुणे परिमंडलातील २०५० पर्यंतच्या वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता अतिउच्चदाबाचे किमान १७ उपकेंद्रांची उभारणी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यात २२० केव्हीच्या बालेवाडी, चऱ्होली, वाघोली, रिव्हरव्ह्यू मगरपट्टा, ताथवडे, मोशी, बावधन, म्हाळुंगे, रोहकल, गहुंजे, कडूस, कोलतेपाटील नेरे, हिंजवडी, मांजरी, सेक्टर १२ प्राधीकरण तसेच १३२ केव्हीच्या खानापूर, कात्रज, भूगाव नॉलेज सिटी येथील अतिउच्चदाब उपकेंद्रांचा समावेश आहे. यातील चऱ्होली व सफारी पार्क येथील अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच भोसरी सेन्चुरी एन्का अतिउच्चदाब उपकेंद्रात ५० एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याबाबत महापारेषणकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
पुणे परिमंडलासाठी ५५७० कोटींचा आराखडा
राज्य शासनाच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेमध्ये पुणे परिमंडलासाठी ५५७० कोटी ८९ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये ३७ नवीन उपकेंद्र, नवीन २३ पॉवर ट्रॉन्सफॉर्मर तसेच इतर कामांचा समावेश आहे. पुणे परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत व ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) तत्पर ग्राहक सेवा देण्यासाठी अधिक सजग व सज्ज राहावे असे निर्देश राजेंद्र पवार यांनी दिले.