उरुळी कांचन – उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गिरमेवस्ती परिसरात एका शेळीवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि.22) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेळी ठार झाली असून, घटनास्थळी हवेली वनविभागाने पंचनामा केल्याची माहिती वनाधिकारी अशोक गायकवाड यांनी दिली.
उरुळी कांचनपासून जवळ असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मचाले वस्ती परिसरात मागील एक महिन्यापूर्वी बिबट्या धुमाकूळ घालत होता. याठिकाणी असलेली भटकी 2 ते 3 कुत्री या बिबट्याने फस्त केली होती; मात्र मागील एक महिन्यापासून बिबट्याला जेरबंद करण्याचा कोणताही प्रयत्न हवेली वनविभागाने अद्याप केला नाही. वनविभागाचा हा निष्काळजीपणाचा कारभार सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर उठणार का, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
उरुळी कांचन शहराजवळ मानवी वस्तीजवळ काही अंतरावर बिबट्या येऊनही वनविभाग कारवाईचे गांभीर्य दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मागील एका महिन्यापासून एक पिंजराही वनविभागाला मिळाला नसल्याने वनविभागाला नागरिकांच्या सुरक्षिततेचे देणे-घेणे नसल्याची विदारक परिस्थिती सध्या पूर्व हवेलीतील शिंदवणे, उरुळी कांचन वळती येथील नागरिक पाहत आहेत.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने वस्तीवरील 2 ते 3 कुत्री फस्त केली असून, या भागात बिबट्याच्या पायाचे ठसे सुद्धा दिसून आले होते. जंगलात अन्न, पाण्याच्या कमतरतेमुळे बिबट्यांचा वावर आता गावांजवळ वाढलेला आहे. तरीदेखील वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करत नाही.
“ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पाहणी केली आहे. शिंदवणे परिसरात बिबट्याच्या दाताचे व्रण दिसून येत आहेत. ते व्रण, पायाचे ठसे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांनी पिंजऱ्याची मागणी केली आहे. दिवसा सदर ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, तसेच नागरिकांनी एकटे बाहेर पडू नये. ग्रामस्थांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” -अशोक गायकवाड, वन अधिकारी
पिकांना पाणी देता येत नाही
शिंदवणेसारख्या डोंगराळ भागाच्या गावात बिबट्या दाखल झाल्याने पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, वळती, तरडे, शिंदवणे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मेंढपाळ व पशूपालन करणाऱ्यांना डोंगरावर गुरे-ढोरे चरण्यासाठी घेऊन जाणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येत नाही.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या भागातील अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात. त्यांच्यामध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या वास्तव्याने या भागात शेतकऱ्यांची गाळण उडाली आहे. तर शेतमजूर कामाला बाहेर पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. गावाजवळच उरुळी कांचन शहराची मानवी वस्ती असल्याने वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचे गांभीर्य नसल्याने वनविभागाची अकार्यक्षमता नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.