मराठा आरक्षणासाठी हातभार लावणार
बारामती/ जळोची- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो माझा दाखला आहे. तो खरा आहे. त्यावर नमूद जात व धर्म हे खरे आहे. मात्र काही लोकांनी दुसरा ओबीसी असल्याचा दाखला फिरवला. ओबीसीबाबत मला आदर आहे. मात्र, जन्माने प्रत्येकाला जी जात असते ती मी लपवू शकत नाही. संपूर्ण जगाला माहिती आहे. माझी जात कोणती आहे. ती मी लपवू इच्छित नाही. जातीवर समाजकारण, राजकारण मी आजवर केले नाही आणि करणार नाही. मात्र या वर्गाचे जे प्रश्न आहेत. त्यासाठी जो हातभार लावावा लागेल. तो मी निश्चित लावेल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ओबीसी असल्याचा दाखला सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. याबाबत पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत मराठा समाजाला आश्वासत केले.
दुष्काळाबाबत बोलताना पवार म्हणाले की, दुष्काळाबाबत राज्य सरकारने सुरुवातीला निकाल जाहीर केला. त्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाऊस नाही. पाणी नाही. जनावरांचे हाल आहेत. सामान्य लोकांचे हाल आहेत. योग्य प्रकारची माहिती केंद्र सरकारला पोहोचवायची होती. ती माहिती राज्य सरकारला पोहोचवण्यात कमतरता आली म्हणून आम्ही केला. मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा हा प्रश्न मांडला. त्यानंतर यामध्ये दुरुस्ती करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत काहीतरी होऊ अशी अपेक्षा आहे.
पूर्वी राजकारणात हिंदू- मुस्लीम वाद पेटविले जायचे. सध्या मराठा ओबीसी वाद पेटवला जात आहे का, असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, मला असे वाटते की, ओबीसी आणि मराठा वाद नाही. काही लोक तसे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पाडव्यावरील चर्चेला पूर्णविराम
दरवर्षी पाडव्यादिवशी संपूर्ण पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर असते. मात्र, यंदाच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता पवार म्हणाले की, रोहित पवारांचा संघर्ष युवा यात्रा दौरा सुरू आहे. प्रत्येकाचे काही प्रश्न आहेत. कोणाचा आजार असेल. त्यामुळे गैरहजर राहिले. म्हणून गैरसमज करण्याचे काही कारण नाही. असे म्हणत पवारांनी अजित पवारांच्या अनुपस्थिती बाबत बोलणे टाळले.
राज्य प्रमुखांकडून ही अपेक्षा नको
शिवसेना ठाकरे व शिंदे गटावर बोलताना पवार म्हणाले की, अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. त्या ठिकाणी त्यांची संघटना मजबूत आहे. दुर्दैवाने अनेक वर्षांपासून त्यांचे जे ऑफिस होते. ते बुलडोझरने तोडले गेले, माझ्या मते असल्या गोष्टी थांबवाव्यात. राज्याच्या प्रमुखांकडून हीच अपेक्षा असते की, त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका घ्यायला हवी. अशाप्रकारे कार्यालय तोडणे ही भूमिका योग्य नाही, असे सांगत पवार यांनी शिंदे यांचे कान टोचले.