Manoj Jarange : राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली होती. दरम्यान, आता जरांगे यांनी मराठा समाजाला आणखी एक नवीन आवाहन केले आहे. दिवाळीचे फराळ खाण्यासाठी राजकीय नेत्यांकडे जाणार असाल तर, आधी त्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारा, त्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठवण्याचं सांगा असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जरांगे पाटील यांनी समाजातील तरुणांना नवीन आवाहन करत,”राजकीय नेते दिवाळीच्या निमित्ताने फराळाचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे या कार्यक्रमांना मराठा समाजातील लोकं जात असतील, तर त्यांनी या नेत्यांकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा. तुम्ही मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा असे सर्वात आधी या नेत्यांना सांगा, असे म्हटले आहे. तसेच, येणाऱ्या अधिवेशनात प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे, असेही या नेत्यांना सांगण्याचा सल्ला जरांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना, अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट नेमकी कशासाठी घेतली याबाबत अधिकृत माहित आमच्याकडे नाही. ही भेट मराठा आरक्षणासाठी होती की, त्यांच्या वैयक्तिक कामासाठी होती हा त्यांचा विषय आहे. मराठा आरक्षणासाठी भेट घेतली असेल तर चांगलंच आहे. तसेच, महाराष्ट्रमधील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची चर्चा झाली असावी अशी अपेक्षा करू, असे जरांगे म्हणाले. मात्र, त्यांची वैयक्तिक भेट असेल तर त्यात आम्हाला पडायचं नाही,” असेही जरांगे म्हणाले.
याचवेळी कुणबी नोंदीबाबत देखील जरांगे यांनी मोठी मागणी केली आहे. “राज्यातील राज घराण्यांकडे असलेली जुनी कागदपत्रे तपासण्यात यावीत, जेणेकरून आणखी नोंदी सापडतील. त्यामुळे, राज्यातील राज घराण्यांना आवाहन करतो की, आपल्याकडील जुनी कागदपत्रे समितीला अथवा अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
दुसऱ्या टप्प्यात उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला मुदत दिली आहे. तेव्हापासून जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, आता आपली तब्येत ठणठणीत असून, 12 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या आपल्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.