Mumbai Fire – भिवंडीत आगीचे सत्र (Mumbai Fire) सुरूच असून, पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळाले आहे. भिवंडी तालुक्यातील राहणाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोविंद कंपाउंड येथे केमिकल गोदामाला भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे.
या आगीत केमिकल साठवून ठेवलेल्या दोन गोदामासह चप्पलचे गोदाम असे तिन्ही गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत आतापर्यत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून नागरिकांच्या डोळ्यांमध्ये जळजळ होत असल्याचे दिसून येत आहे. तरी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहे.
10 दिवसांपूर्वीच भिवंडी तालुक्यातील पूर्णा गावच्या हद्दीत असलेल्या दालमिल कंपाऊंड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली होती. केमिकल गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल फॉर्म पावडर तसेच, केमिकलचे ड्रम्स आणि डिंक होते.
सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही, पण या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर दोन तासानंतर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.