कराड – येथील कराड वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांना केसेसचे टार्गेट देण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. तसेच काही वाहतूक पोलीस नागरिकांशी उद्धत वर्तन करून त्यांच्याशी उरमटपणे बोलत असल्याच्या, तसेच जाणीवपूर्वक गाडीचे फोटो काढून केसेस करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. याबाबत दैनिक प्रभातने केलेल्या वृत्तांकनानंतर वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. तसेच नागरिकांशी नम्रपणे बोलून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.
या ना त्या कारणांनी नेहमीच कराड वाहतूक शाखा चर्चेचा विषय ठरत असते. शाखेतील काही पोलीस कर्मचारी नागरिकांशी उर्मटपणे बोलून उद्धट वर्तन करत असल्याच्या नागरिकांच्या अनेकदा तक्रारी आल्या आहेत तसेच जाणीवपूर्वक गाडीचे फोटो काढून त्यांना आर्थिक भुर्दंड केला जात असल्याचीही नागरिकांची ओरड होती. दुचाकीवर वा चारचाकी गाडीमध्ये चालक असतानाही त्यांना सूचना देण्याऐवजी गाडीचे फोटो काढून त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड लावला जात असल्याचे प्रकार घडत होते.
याबाबत दैनिक प्रभातमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर कराड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडझडती घेतली. तसेच नागरिकांशी उद्घाटपणे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सक्त ताकीद दिली असून नागरिकांशी नम्रपणे बोलून, वागून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्याबाबतही बजावण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील यशवंत हायस्कूल, हेड पोस्ट, कन्या शाळा आदी. ठिकाणच्या वाहतुक कोंडीवर वाहतूक पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच वडाप व रिक्षा थाब्यांवर होणारे अस्ताव्यस्त पार्किनमुळे वाहतूक कोंडीत पडणारी भर यावरही पोलिसांनी उपाययोजना करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.
नागरिकांशी उद्धटपणे वर्तन करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने दंड करण्यात आला असल्यास नागरिकांनी ऑनलाई तक्रार नोंदवावी.
– चेतन मछले (सपोनि, वाहतूक शाखा, कराड शहर).
पहिले पाढे पंचावन्न?
कराड वाहतूक शाखेतील काही पोलीस कर्मचारी नागरिकांशी उर्मटपणे बोलणे, त्यांच्याशी उद्धट वर्तन करणे, जाणीवपूर्वक गाडीचा फोटो काढून त्यांना आर्थिक झळ पोहचवणे असे प्रकार करतात. त्यांच्यामुळे एकूणच वाहतूक शाखा बदनाम होते. अशांवर अनेकदा पोलीस खात्यांगर्त कारवाई करण्यात आली. त्यांची कानउघडणी झाली. परंतु, काही दिवसानंतर पहिले पाढे पंचावन्न? अशीच परिस्थिती दिसून आली. आता नुकतीच समज देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वागणुकीत काही फरक पडणार की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न? हे पाहावे लागेल.
अवजड वाहनांना वेळमर्यादा हवी
शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध दुकानांमध्ये माल घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांमुळेही मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. सध्या नवरात्रोत्सव सुरु असून सदरा, दीपावली सणही तोंडावर आहे. त्यामुळे अशा अवजड वाहनांसाठी वेळमर्यादा ठरवून देण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.