हातवळण (ता. दौंड): मृतदेह शोधण्यासाठी जमलेले पोलीस व ग्रामस्थ.
यवत – दौंड तालुक्यातील हातवळण येथे भीमा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहापैकी तीन मुले वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 7) घडली होती. तिघांपैकी एकाचा मृतदेह शनिवारी सापडला होता तर बाकी दोन मृतदेह रविवारी (दि. 8) पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या हाती लागले.
शनिवार (दि. 7) दुपारी हातवळण (ता. दौंड) येथील वसंत विठ्ठल फडके यांच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर दिलेराम बसू सिंग (वय 45) यांचा मुलगा विशाल, भाचा निखिल, मेहुणीचा मुलगा अमित, देव, निपिल व नीरजकुमार असे सहा जण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नदीच्या पात्रात होण्यासाठी गेले होते मात्र यामधील तिघेजण नदीच्या पात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
या घटनेची माहिती मिळताच भीमा नदीपात्रात पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, समीर भालेराव, हनुमंत भगत, यांच्यासह ग्रामस्थ मंगेश फडके पोलीस पाटील म्हेत्रे, आदींनी घटनास्थळी गाव घेतली. पोलिसांनी मासेमारी करणारे मच्छिमार यांच्या होडीतून व ग्रामस्थांच्या मदतीने या मुलांचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू केले होते; मात्र बराच वेळ शोध कार्य केल्यानंतर शनिवारी अमित याचा मृतदेह आढळून आला. दुसऱ्या दिवशी रविवार सकाळी विशाल व निखिल यांचे मृत्यू शोधण्यात पोलिसांनी यश आले. एक मृतदेह कानगाव हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तर दुसरा हातवळण हद्दीत मिळाला.
पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, सागर चव्हाण, समीर भालेराव, हातवळणचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष मंगेश फडके यांनी नदीच्या पात्र शोध मोहिमेत मोठे कसरत केल्याने तब्बल 12 तासानंतर दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामे केला असून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी यवत येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी आकस्मृतीची नोंद केली असून पुढील तपास पाटस पोलीस करत आहेत.