नवी दिल्ली – पत्रकारांच्या घरांवर पोलिसांकडून घालण्यात येत असलेले छापे आणि पत्रकारितेशी संबंधित उपकरणे जप्त करण्यात येत असल्याप्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी देशभरातील काही प्रमुख प्रसिद्धी माध्यमानी सरन्यायाधीश (Chief Justice) धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्याकडे केली आहे. सरन्यायाधीशांना पाठवण्यात आलेल्या पत्रावर डिजीटल न्यूज इंडिया फौंडेशन, इंडिया वुमन्स प्रेस कॉर्प्स आणि प्रेस क्लब ऑफ इंडियासह एकूण 15 माध्यम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.(press)
देशभरातील बहुतेक पत्रकार “बदला घेतला जाण्याच्या भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. आपण सर्वजण राज्यघटनेला बांधील आहोत, या सत्याला न्यायपालिकेने सामोरे गेले पाहिजे.’ असे या संघटनांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. (Journalists Association)
पत्रकारांची चौकशी केली जाणे आणि त्यांचे मोबाईल, लॅपटॉप ताब्यात घेतले जाण्याच्या संदर्भात काही निकष निश्चित केले जायला हवेत, अशी मागणीही पत्रकारांच्या संघटनेने केली आहे. असाप्रकारे मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतल्यानंतर वास्तविक गुन्ह्यांशी काहीही संबंध नसताना हेरगिरी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जायला हवी आणि सरकारी संस्थांची जबाबदारी निश्चित केली जायला हवी, असेही म्हटले गेले आहे.
न्यूजलिंक या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित 46 कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे घातले गेल्याच्या संदर्भाने ही मागणी करण्यात आली. सरकारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी संबंधित केलेल्या वार्तांकनाशी सरकार असहमत असल्यामुळेच ही कारवाई केली गेल्याचा दावा, माध्यमांच्या संघटनेने केला आहे.