काठमांडू – नेपाळने सीमाभागात लागू केलेली संचारबंदी आणखीन काही काळासाठी वाढवली आहे. भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या लोकांना त्यांच्या नियोजित ठिकाणी नेऊन सोडण्यात आले आहे. जातीय तणाव रोखण्यासाठी सीमाभागामध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंगळवारी सोशलम मीडियावरील एका पोस्टवरून झालेल्या संघर्षामध्ये किमान 22 जण जखमी झाले होते. यामध्ये 5 सुरक्षा रक्षकांचाही समावेश होता. काठमांडूपासून 400 किलोमीटर अंतरावरील नेपालगंजमध्ये हा संघर्ष झाला होता. त्यानंतर बांके जिल्ह्याच्या प्रशासनाने मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून बेमुदत काळासाठी परिसरामध्ये संचारबंदी लागू केली होती. तणाव निर्माण झालेला भाग भारतातील उत्तर प्रदेशला लागूनच आहे.
संचारबंदी अधिक तीव्र करण्यात आली आहे आणि जमुनाहा पॉईंट मार्गे नेपाळमध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेले जात आहे, असे बांके जिल्ह्याचे मुख्य अधिकारी बिपीन आचार्य यांनी सांगितले. तणाव कमी करण्यासाठी लवकरच एक सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.