मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निकालानुसार आधी, अधिकृत पक्ष कोणता आणि पक्षप्रमुख कोण हे ठरवावे लागणार आहे, त्यानंतरच प्रतोताची नियुक्ती आणि आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाली निघेल, असे मत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते माध्यमंशी बोलत होते. यावर आता ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर समनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. (Uddhav Thackeray )
काय आहे समनाचा अग्रलेख
आपले स्पीकरसाहेब घानाच्या भूमीवर निघाले आहेत ते जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी. त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांचे स्वागत घानात होणार आहे काय? लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे. लोकशाहीचा खून करून लोकशाही कल्याणाची प्रवचने झोडणे म्हणजे इदी अमिनने मानवतेवर चर्चा करण्यासारखेच आहे. स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) घानात निघाले होते. मात्र अखेर जनमताचा रेटा एवढा वाढला की, स्पीकर महाशयांनी हा दौरा रद्द केला, अशी बातमी हा मजकूर छापता छापता आली. निदान यापुढे तरी जनमताला गृहीत धरू नका.
विनोदाची निर्मिती कशी होईल ते सांगता येणार नाही, पण विनोद निर्मिती ही विसंगतीतून होते एवढे मात्र खरे. राज्यातील लोकशाही, संविधान, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा खुंटीला टांगून आपले स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) हे घाना नामक देशी लोकशाही, संसद या विषयांवरील आंतरराष्ट्रीय चर्चेत भाग घ्यायला निघाले आहेत. ही एक विसंगती आहे व विनोद तर आहेच आहे. एक वर्षापासून येथे घटनाबाह्य सरकार अधिकारावर आहे. शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निवाडा दिला तरीही ‘स्पीकर’ वर्षभर सुनावणी घेत नाहीत व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दटावले तेव्हा ते लोकशाहीवर चर्चा करण्यासाठी घानाला निघाले आहेत. घाना देशात 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत ते उपस्थित राहणार आहेत. तेथे म्हणे जागतिक संसदीय लोकशाही, राजकीय प्रश्नांवर विचारमंथन होणार असून आपले स्पीकरसाहेब तेथे लोकशाहीवर चर्चा करतील. इकडे आपल्या नजरेसमोर लोकशाही, संविधानाचा मुडदा पाडायचा आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर प्रवचने झोडायची. घाना हा पश्चिम आफ्रिका खंडातील एक देश आहे. अशा देशात आपले स्पीकरसाहेब निघाले आहेत. त्यामुळे आमदार अपात्रतेच्या सुनावणीस आणखी विलंब होईल. किंबहुना, हा विलंब लागावा म्हणूनच स्पीकरसाहेबांना घाना येथे जाणाऱया शिष्टमंडळात समाविष्ट केले असावे. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांना याच राष्ट्रकुल परिषदेसाठी घाना येथे जायचे होते. त्यांना तसे आमंत्रण होते, पण दिल्ली विधानसभा अध्यक्षांची घाना
दौऱ्याची फाईल
नायब राज्यपाल व वित्त विभागाने रोखून ठेवली. येथील स्पीकरसाहेबांची फाईल तत्काळ मंजूर झाली. आमदार अपात्रतेबाबत वेळ काढण्यास त्यांना ‘आंतरराष्ट्रीय’ कारण मिळावे म्हणून घाना देशी आपले स्पीकरसाहेब जातील व लोकशाहीवर प्रवचन झोडतील. हे विडंबनच म्हणावे लागेल. घाना देशाचे एक वैशिष्टय़ आहे, त्यांच्या काही परंपरा आहेत. येथील लोकांची प्रथा अशी आहे की, घानातील लोक मृत्यूनंतर अश्रू ढाळत बसत नाहीत, तर ते आनंदाचा उत्सव साजरा करतात. एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबातील लोक ‘फ्युनरल’ पार्टी देतात. छान कपडे, उत्तम जेवण, उंची मद्याची रेलचेल या पार्टीत असते. आता या ‘फ्युनरल पार्टी’चा आणि आपल्या स्पीकरसाहेबांच्या घाना दौऱ्याचा काय संबंध? संबंध असा की, स्पीकरसाहेब मराठी मुलखात लोकशाहीचा मुडदा पाडून घाना येथे निघाले आहेत. मृत लोकशाहीसाठी एखादी ‘फ्युनरल पार्टी’ ते घानातील परंपरेनुसार नक्कीच करतील. शेवटी मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची ‘घाना’ परंपरा महाराष्ट्रातही पाळली जात आहे. लोकशाही मृत होऊन पडली आहे व त्याचा उत्सव गेले वर्षभर साजरा होतोय. बहुधा यामुळे आपल्या स्पीकरसाहेबांना घाना येथे आमंत्रित केलेले दिसते. विधानसभेचे अध्यक्ष वर्षभर बेकायदेशीर सरकार चालवू देत आहेत. त्यांनी आमदारांना ‘पात्र’ ठरवावे किंवा ‘अपात्र’ हा त्यांचा निर्णय, पण निर्णय घेण्याची हिंमत दाखवा, जे घटनेचेच निर्देश आहेत त्यांचे पालन करा, पण घटनेच्या
दहाव्या शेडय़ूलनुसार
आमदारांना अपात्र व्हावेच लागेल. हा मृत्यू अटळ आहे. मात्र आजचे मरण उद्यावर ढकलत ते वर्षभर पुढे ढकलले गेले आहे. त्यात देशाची लोकशाही व संविधानाची हत्या दिवसाढवळ्या झाली आहे. स्पीकरसाहेब म्हणतात, ‘‘मी घाईघाईने निर्णय घेणार नाही.’’ घाईघाईने निर्णय घेणार नाही याचा अर्थ कधीच निर्णय घेणार नाही किंवा मनमर्जीप्रमाणे निर्णय घेईन असे नाही. मनात आणलं तर घानाला प्रयाण करण्याआधीदेखील निर्णय घेऊ शकतात. इथे लोकशाहीला संजीवनी देणारा निर्णय घ्या आणि मग घानातील लोकशाही उत्सवात सामील व्हा, पण आपले स्पीकरसाहेब घानाच्या भूमीवर निघाले आहेत ते जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी. त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांचे स्वागत घानात होणार आहे काय? देशातील लोकशाहीवादी संस्थांनी, संघटनांनी स्पीकरसाहेबांच्या या लोकशाहीविरोधी उचापतींची माहिती घाना देशात व कॉमनवेल्थ परिषदेस कळवून मुखवटेच फाडले पाहिजेत. लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे. लोकशाहीचा खून करून लोकशाही कल्याणाची प्रवचने झोडणे म्हणजे इदी अमिनने मानवतेवर चर्चा करण्यासारखेच आहे. स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) घानात निघाले होते. मात्र अखेर जनमताचा रेटा एवढा वाढला की, स्पीकर महाशयांनी हा दौरा रद्द केला, अशी बातमी हा मजकूर छापता छापता आली. निदान यापुढे तरी जनमताला गृहीत धरू नका. Uddhav Thackeray