Chagan Bhujbal : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच तुरूंगातून जामिनीवार बाहेर आलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रमेश कदम यांनी मंत्री छगन भुजबळ तुरूंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असे विधान केले आहे.
रमेश कदम यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रमेश कदम यांनी, “तुरुंगात असताना छगन भुजबळ रोज आजारी पडायचे. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण, आता भुजबळ एकदम तंदरूस्त आहेत. त्यांच्या छातीत दुखतंय, पाय सुजलाय, खांद्याचा त्रास होतो, हे आता आम्ही ऐकलं नाही.” असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना त्यांनी,“तुरूंग हे कोणाच्याही नशिबात येऊ नये. तुरूंग नर्क आहे. तुरूंगात गेल्यावर आठ दिवसांत लोक आजारी पडतात, छातीत दुखतं आणि बरंच काही होतं. पण, ही कारणं सांगून नेते, लोक आणि पक्षाची सहानभुती घेत जामीन मिळवतात. तेव्हा छगन भुजबळांनीही हेच केलं,” असे म्हटले आहे.
तसेच “जामिनासाठी उशीर होत असल्याने शरद पवारांनी मदत केली पाहिजे, अशी नाराजी छगन भुजबळ बोलून दाखवायचे. माझा जामीन झाला नाहीतर, वेगळा मार्ग स्विकारावा लागेल, अशा पद्धतीने भुजबळांनी शरद पवारांना ब्लॅकमेलिंग केल्याचे आम्ही पाहिलं आहे,” असे रमेश कदम यांनी सांगितले आहे. दरम्यान, अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रमेश कदम तुरूंगात होते. नुकतेच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.