राजकोट :- भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व अखेरचा सामना आज (बुधवार) येथे होत आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकलेला भारतीय संघ या सामन्यासह संपूर्ण मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखून ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देण्यासाठी सज्ज असून, पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेले सर्व प्रमुख खेळाडू संघात परतणार आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया(तिसरा सामना)
वेळ – दुपारी 1.30 पासून
ठिकाण – राजकोट
थेट प्रक्षेपण – स्पोर्टस 18
पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाचे नेतृत्व लोकेश राहुलकडे सोपवण्यात आले होते. नियमित कर्णधार रोहिदत शर्मासह विराट कोहली, कुलदीप यादव व हार्दिक पंड्या यांना विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता हे सर्व खेळाडू संघात परतणार असल्याने संघाची ताकद वाढणार आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 5 गडी राखून तर दुसरा सामना 99 धावांनी जिंकला होता.
भारताची फलंदाजी ऑस्ट्रेलियापेक्षाही बळकट असल्याचे या दोन्ही सामन्यांत सिद्ध झाले होते. त्यातच आता प्रमुख फलंदाज रोहित व विराट संघात परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भरच पडणार आहे. गोलंदाजीतही महंमद शमीने पहिल्या सामन्यात तर रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा आणि प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य फलंदाजीची वाताहत केली होती. तसेच शुभमन गिल व श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली होती, तर बदली कर्णधार राहुल व सूर्यकुमार यादव यांनी वादळी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवरही दडपण राखले होते.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघातही या अखेरच्या सामन्यासाठी काही बदल होणार आहेत. त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या सामन्यातून विश्रांती घेतली होती, तो आता या अखेरच्या लढतीसाठी संघात परतेल. तसेच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलही संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला होता, त्याच मालिकेत मॅक्सवेलला दुखापत झाली होती. मात्र, आता तो पूर्ण मॅचफिट असून या लढतीत खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी म्हणावी तशी या मालिकेत चमकदार झाली नाही व त्यामुळेच त्यांना पहिले दोन सामने गमवावे लागले. आता या सामन्यात त्यांच्या गोलंदाजांनी यश मिळवले तरच त्यांना विजयाची आशा आहे, अन्यथा मालिका 3-0 अशी गमावण्याचा धोका आहे.
कोहलीच्या शतकाची अपेक्षा…
यंदाच्या मोसमात भरात असलेला भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याच्या शतकी खेळीची आता चाहत्यांना अपेक्षा आहे. कोहलीसमोर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांचा विक्रम मोडण्याचे लक्ष्य आहे. कोहलीच्या नावावर आता 47 शतके असून, आज त्याने शतक केले तर सचिनची बरोबरी करण्यासाठी त्याला आणखी 2 तर विक्रम आपल्या नावावर जमा करण्यासाठी तीन शतकांची गरज आहे. विश्रांतीनंतर परतत असल्याने कोहलीही मोठ्या धावसंख्येसाठी उत्सुक असेल.