– हिमांशू
खूप चांगलं बोललात तुम्ही साहेब! कार्यकर्त्यांना “मार्गदर्शन’ करावं तर तुम्हीच! 2024 मध्ये “महाविजय’ खेचून आणण्यासाठी तुमच्यासारख्या नेत्यांची नितांत गरज आहे. एक तर “दिल्लीतून सोडलं की थेट गल्लीत पोहोचवणारे’ दोन लाख व्हॉट्सऍप ग्रुप सुरू करण्याची तुमची योजना स्पृहणीय आहेच; शिवाय जे काही “निगेटिव्ह’ छापून येऊ शकतं, त्या बातम्यांच्या मजकुराला बोळे लावण्याची स्कीम तर इतकी प्रशंसनीय आहे, की तुमचं अभिनंदन करायला पत्रकारांकडे शब्दच उरलेले नाहीत.
2024 पर्यंत तुमच्या कार्यकर्त्यांसोबत आपल्याला कुणी पाहू नये, याची काळजी पत्रकारांनी घ्यावी, अशी व्यवस्था तुम्ही करून ठेवलीये. एखादा पत्रकार तुमच्या कार्यकर्त्यांसोबत दिसला तर “चहा प्यायला गेला होतास का,’ असंच संबंधित पत्रकाराला लोक विचारतील. किती ठाम वक्तव्यं आहेत हो तुमची..! “महाविजय’ होईपर्यंत आपल्याविरुद्ध काही छापून येताच कामा नये, असा तुमचा पक्का निर्धार आहे. त्यासाठी तुम्ही कार्यकर्त्यांना “रोडमॅप’ दिलात, तेही बरं झालं. तुमच्या विरोधात बातमी छापणारे पत्रकार तुम्हाला “कलाकार’ वाटतात.
कार्यकर्त्यांनी आपल्या भागातल्या अशा चार-पाच “कलाकारां’ची यादी तयार करायची, मग ते प्रिन्ट मीडियावाले असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावाले असतील. त्यांना महिन्यातून एकदा चहाला बोलवायचं. म्हणजे “महाविजय 2024’पर्यंत ते तुमच्याविरुद्ध काही छापणारच नाहीत. एकदम बेस्ट आयडिया आहे; पण हा उकळता चहा नकळत तुमच्याच अंगावर सांडला ना राव! चहाची नुसती आयडिया देऊन तुम्ही थांबला नाहीत. “चहाला म्हणजे काय हे तुम्हाला समजलंच असेल,’ अशी “हिंट’सुद्धा तुम्ही हुशार आणि अनुभवी कार्यकर्त्यांना देऊन टाकलीत.
“चाय पे चर्चा’ फलद्रुप झालीच नाही, तर पुढे काय करायचं हेही सांगून टाकलंत. हे तुमचं काटेकोर बूथवाईज नियोजन “मेरा बूथ सबसे मजबूत’ हा तुमचा स्लोगन अर्थपूर्ण करणारं ठरो, अशा शुभेच्छा दिल्या असत्या; पण तसं काही होणार नाहीये. कारण बैठकीच्या ठिकाणी आपले हे अनमोल शब्द रेकॉर्ड होत असतील, अशी पुसटशी शंकाही तुम्हाला आली नाही. तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे आपली प्रायव्हसी संपत चाललीये म्हणून सामान्यातला सामान्य माणूस आज चिंतातुर आहे. पण तुमच्यासारखे राजकारणी माणसांप्रमाणेच तंत्रज्ञानालाही आपला गुलाम समजून निर्धास्त राहतात, याला काय म्हणावं?
“खबरदारी कशी घ्यायची,’ या विषयावर बोलताना तुम्ही स्वतःच खबरदारी घेतली नाहीत आणि तुमचं हे अगाध नियोजन राज्यभर व्हायरल झालं की हो..! बरं, त्यावर स्पष्टीकरण देताना तरी खबरदारी बाळगाल की नाही? चांद्रयानाच्या शास्त्रज्ञांपासून महिला आरक्षणापर्यंत चार-दोन गोष्टींचा उल्लेख करून “तरीसुद्धा निगेटिव्ह बातम्या येतात,’ अशी तक्रार तुम्ही केलीत. “पत्रकारांचा सन्मान करा असं मी कार्यकर्त्यांना सांगितलं,’ हे स्पष्टीकरण तर इतकं गमतीशीर आहे,
की बैठकीतला तुमचा “टोन’ आणि हे स्पष्टीकरण यांचा मेळ बसूच नये, याची पुरेपूर दक्षता तुम्ही घेतल्याचं स्पष्ट जाणवावं. महाशय, “पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा,’ या तुमच्या वक्तव्यावर कार्यकर्ते फिदीफिदी हसले असतील; पण पत्रकार नक्कीच हसलेले नाहीत. आपण काहीही बोललं तरी खपून जातं, लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते, असं समजून रेटून नेण्यासारखं हे वक्तव्य नाही, इतकंच!