– हेमंत महाजन
नुकतेच चीनने पुन्हा एकदा धमकी दिली आहे, की जर तैवान मुकाट्याने चीनमध्ये सामील झाला नाही, तर आम्ही तैवानवरती लष्करी हल्ला करू शकतो. त्याबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत.
200 हून जास्त वेळा हवाई हद्दीचा भंग
गेल्या वर्षभरामध्ये चीनने 200 हून जास्त वेळा आपल्या हवाई दलाचा वापर करून तैवानच्या हवाई हद्दीचा भंग केला. चीन लष्करी हल्ला करून तैवानचे चीनमध्ये कसे विलीनीकरण करू शकतो याचे विश्लेषण करू. असे झाले तर, भारताने नेमके काय करावे, तैवानला किंवा पश्चिमी देशांना कशाप्रकारे लढाईकरता मदत करावी?
लष्करीदृष्ट्या तैवान एक बेट आहे. तैवान चीनपासून 120 ते 180 किलोमीटर लांब आहे. मध्ये तैवानचा समुद्र आहे. तैवान एक युरोपसारखा अतिशय शहरी आणि विकसित देश आहे. चीनला जर आक्रमण करायचे असेल तर तैवानच्या पूर्वेकडूनच करावे लागेल, कारण पश्चिमेकडून आक्रमण करणे हे भौगोलिक परिस्थितीमुळे (खडकाळ समुद्रकिनारा) शक्य नाही.
चीनला तैवानवरती समुद्राच्या बाजूने आक्रमण करावे लागेल आणि अशा प्रकारच्या आक्रमणाला एमफिअबीयस ऑपरेशन्स असे म्हटले जाते. अशी ऑपरेशन्स दुसऱ्या महायुद्धात झाली आहेत, परंतु त्यानंतर फक्त एकदा असे ऑपरेशन इंग्लंडने फॉकलॅंड युद्धामध्ये अर्जेंटिनाच्या विरुद्ध केले होते. असे ऑपरेशन करण्याची चीनची क्षमता आहे का?
लष्करी आक्रमण पाच ते सहा भागांमध्ये
चिनी लष्करी आक्रमण पाच ते सहा फेजेस म्हणजे भागांमध्ये केले जाईल. पहिल्या भागामध्ये चीन लढाईची तयारी करेल, ज्यामध्ये समुद्र पार करून ऑपरेशन करणे, हवाई दलाचा आणि नौदलाचा वापर करणे, रात्रीच्या वेळी लढण्याची तयारी करणे, स्वतःचे किनारपट्टीवरती असलेले लष्करी तळ अजून मजबूत करणे आणि आपल्या सैन्याला देशाच्या वेगवेगळ्या भागातून किनारपट्टीवर आणणे अशी कामे व ट्रेनिंग व युद्ध अभ्यास केला जाईल, लष्करी तयारी केली जाईल.
लढाईच्या दुसऱ्या भागामध्ये तैवानला चारी बाजूने वेढले जाईल. चिनी नौदल आणि हवाई दल चारी बाजूने तैवानला वेढा घालेल आणि तैवानला बाकीच्या जगापासून वेगळे केले जाईल. ज्यामुळे कुठल्याही प्रकारची मदत समुद्राकडून किंवा आकाशातून तैवानला अमेरिका, साउथ कोरिया, जपान किंवा इतर कुठल्याही देशांकडून मिळू शकणार नाही.
लॉंग रेंज शस्त्रांचा वापर
लढाईच्या तिसऱ्या भागांमध्ये चीन आपल्याकडे असलेल्या लॉंग रेंज म्हणजे लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करून तैवानला घाबरण्याचा प्रयत्न करेल. तैवान सैन्याचे नुकसान करेल. यामध्ये मिसाइल म्हणजे क्षेपणास्त्रांचा वापर, हवाई दलाचा वापर, नौदलाचा वापर केला जाईल. तैवानच्या डिफेन्सेसवरती हल्ला करून त्याला पूर्णपणे बरबाद केले जाईल, जसे युक्रेन युद्धामध्ये झाले. याशिवाय तैवानवरती मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले केले जातील, त्यांचे कमांड आणि कंट्रोल बरबाद केले जाईल. तैवानच्या विरुद्ध इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे मानसिक, अपप्रचार आणि दुष्प्रचार युद्ध करून तैवानच्या जनतेला घाबरवले जाईल. उद्देश असेल कृपया लढाई करू नका, मुकाट्याने चीनला शरण जा.
किनारपट्टीवरील डिफेन्सेसवर कब्जा
लढाईच्या चौथ्या भागामध्ये चीन समुद्राकडून हल्ला करून तैवानच्या किनारपट्टीवरती असलेल्या डिफेन्सेस वरती कब्जा करेल, हल्ला आकाशातून हेलिकॉप्टर्स आणि एअर फोर्सच्या मदतीने हल्ला केला जाईल. त्यानंतर पुढच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिनी सैन्य हे तैवानच्या किनारपट्टीवरती जिंकलेल्या भागात उतरवले जाईल, ज्यामध्ये रणगाडे, चिलखती वाहने असतील.
युक्रेनच्या युद्धामध्ये सैनिकांकडे असलेल्या क्षेपणास्त्रांची क्षमता लक्षणीय होती. रशिया विरुद्ध युक्रेनच्या सैनिकांकडे असलेल्या क्षेपणास्त्रांचा विजय झाला. रणगाडे मोठ्या प्रमाणात बरबाद झाले. रशियन एअर फॉर्स आणि हेलिकॉप्टरचासुद्धा फारसा वापर झाला नाही. कारण त्यांना क्षेपणास्त्रपासून हल्ल्याची भीती होती. रशियाच्या मोठ्या जहाजांवरती क्षेपणास्त्र हल्ले झाले, त्यामुळे मोठी जहाजेसुद्धा लढाईमध्ये वापरण्यात आली नाही. म्हणजेच रणगाडे, चिलखती वाहने, मोठ्या लढाऊ बोटी, मोठी विमाने यांचे पारंपरिक युद्धामध्ये क्षेपणास्त्रांच्या मदतीने खूप नुकसान केले जाऊ शकते. तैवानसुद्धा नेमके हेच करण्याचा प्रयत्न करेल.
शहरांमधील तीव्र युद्ध
त्यानंतर तैवानची महत्त्वाची शहरे खास तर राजधानीवरही हल्ला केला जाईल; परंतु मात्र या वेळेला शहरांमधले अतिशय तीव्र असे युद्ध सुरू होईल आणि लक्षात असावे की युक्रेनच्या युद्धामध्ये रशियाने शहरांच्या आत जाऊन लढाई करून शहरांवरती कब्जा करण्याची हिंमत केलेली नाही. कारण, शहरांमध्ये युद्ध हे पायदळाचे असते, लढाई समोरासमोर होते आणि यामध्ये आक्रमण करणाऱ्या सैन्याचे खूप नुकसान होते. अशा प्रकारचे रक्त सांडणारे युद्ध तयार करण्याकरता चीन तयार असेल का? असली क्षमता गेल्या दोन वर्षात रशियाने युक्रेन युद्धामध्ये दाखवलेली नाही. चीन शेवटचे पारंपरिक युद्ध 1979 मध्ये व्हिएतनाम विरुद्ध लढला होता. चीनला आपल्या इतर सीमा म्हणजे भारत, रशिया, साउथ ईस्ट देशांना लागलेल्या सीमांवर असलेले आपले सैन्य तैवानच्या बाजूला वळवता येणार नाही.
चिनी सैन्याची तयारी असेल का?
ज्या वेळेला शहरांमधली लढाई सुरू होईल त्यावेळेला कुठलेही तंत्रज्ञान फारसे काम करणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सायबर युद्ध याचा फारसा परिणाम होणार नाही. जर तैवानचे सैन्य आणि जनता लढली, तर चीनला खूप रक्त सांडावे लागेल. तैवानचे सैन्य अत्याधुनिक आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत. त्यांचे डिफेन्सेस अतिशय मजबूत आहे. युद्ध जास्त दिवस चालले तर चीनला दारूगोळा म्हणजे ऍम्युनिशनची कमी पडेल,
जी पाकिस्तान, रशिया आणि नॉर्थ कोरियाच्या मदतीने चीन कमी करेल. तैवानला अर्थातच पश्चिमी देश आणि अमेरिका मदत करतील.असे मानले जाते, की जर युद्ध जास्त दिवस चालले तर, रशियाप्रमाणे चीन तैवानच्या दलदलीमध्ये पुष्कळ वेळ फसू शकतो. ज्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा धक्का बसेल. मात्र चीन-तैवान युद्ध, भारताला जगातली दुसरी मोठी आर्थिक ताकद बनण्याची संधी देईल.