फुरसुंगी – फुरसुंगी-उरूळीदेवाची या दोन गावांची मिळून नवीन नगरपरिषद स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 मार्च 2023 रोजी केलेली आहे. त्यावर पुणे मनपा आयुक्तांनी ही दोन गावे वगळण्याची घोषणाही प्रसिद्ध करून सर्व शासकीय औपचारिकता पूर्ण केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या हरकती सूचना घेऊन राज्य शासनाला अहवालही पाठविला आहे. याचिकाकर्ते या निर्णयाचे विरोधात न्यायालयात गेल्याने सदर याचिका रद्द करून पुढील कार्यवाही करण्याचे कळविले आहे. मग, आता या दोन गावांची गेल्या एक वर्षांपासून पालिका ही नाही अन् नगरपरिषद ही नाही अशी अवस्था असून सर्वच कामांत अडथळे येत आहेत. शासनाने या गावांबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
फुरसुंगी आणि उरूळीदेवाची या दोन्ही गावांत मूलभूत नागरी सुविधांसह विकासकामे प्रलंबित आहेत. यामुळे या नवीन नगरपालिकेचा अंतिम जीआर केव्हा निघणार व या ठिकाणचे कामकाज कधी सुरू होणार? असे प्रश्न येथील राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकही विचारू लागले आहेत. शासनाने केलेल्या सूचनेप्रमाणे ही दोन्ही गावे अद्यापही महापालिकेतच आहेत. महापालिका मात्र विकासकामांसाठी निधी देण्यात तसेच मूलभूत सुविधा पुरविण्यात दुजाभाव करीत आहे.
राज्य शासनाने नगरपालिकेचा अंतिम “जू आर’ तत्काळ काढून फुरसुंगी आणि उरूळीदेवाची या गावांतील नागरिकांना दिलासा द्यावा. महापालिकेनेही गावांकडे दुर्लक्ष करू नये, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. – विशालनाना हरपळे,
सामाजिक कार्यकर्ते
ही कामे रेंगाळलेलीच…
गावांतील नवीन रस्ते, एमजीपीचे पाणी, नवीन ड्रेनेज, वीज, सरकारी आरोग्य सेवा, टॅंकरने होणारा पाणी पुरवठा, विविध प्रकारचे दाखले, नवीन बांधकाम नोंदी, नवीन बांधकाम परवाने, थकीत टॅक्स, मयताचे दाखले, आवश्यक झोन दाखले, दोन टिपी स्किम, नवीन डेव्हलपमेंट प्लॅन, कचरा संकलन, नवीन टाक्यांची कामे, विविध शासकीय योजना अशा सर्व प्रकारची कामे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत.