मलठण -दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पुरेसा पाऊस न झाल्याने शेती पिकांबरोबरच विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. मौजे काळेवाडी गावाला नळ पाणीपुरवठा करणारी योजना या तलावातील पाण्यावर अवलंबून आहे. परंतु तीन महिने उलटूनही पावसाने ओढ दिल्याने तलावातील पाणी पातळी शून्य टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे काळेवाडी गावावर पाणी टंचाईचे सावट उभे ठाकले आहे.
मौजे काळेवाडी येथील शासकीय गायरान जमिनीमध्ये चार माती व सिमेंटचे छोटे छोटे साठवण तलाव आहेत. दरवर्षी पावसाळ्यामध्ये हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरतात. पावसाने ओढ दिल्याने परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. हिंगणीबेर्डी ग्रामपंचायतीमधील काळेवाडी, विठ्ठलनगर व हिंगणीबेर्डी गावठाण अशा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजना या बंधाऱ्यावर अवलंबून आहेत. परंतु बंधाऱ्यामध्ये पाणी नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
“सध्या साठवण बंधाऱ्यामध्ये पाणी शिल्लक नाही. त्यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाला कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी आम्ही ग्रामस्थ करत आहोत. जेणेकरून काही प्रमाणात शेतीचा, जनावरांचा व नळ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना काहीसा दिलासा मिळेल.” – गणेश गायकवाड, माजी सदस्य ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी