संसाराचा गाडा चालवत असताना आणि आपल्या कुटुंबाची प्रगतीसाठी आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी पार पडत असताना समाजातील गोरगरीब कुटुंबाचे संसार उभे करून व महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम तसेच गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी गावात विकासकामाचा धडाका लावून गावचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प जवळे (ता. आंबेगाव) येथील सुशिक्षित तरुण महिला, आदर्श सरपंच वृषाली उत्तम शिंदे-पाटील यांनी केले. आहे.
आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील छोट्याशा गावातील वाणिज्य शाखेच्या पदवीधर सौ. वृषाली यांचा विवाह शेती व्यावसायिक व समाजसेवक उत्तम शिंदे पाटील यांच्याशी झाला. उत्तम शिंदे यांनी काही दिवस गावच्या पोलीस पाटील पदावरही काम केलेले आहे. यामुळे घरातच धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्य करण्याची पार्श्वभूमी होती. यामुळे वृषाली शिंदे पाटील या सामाजिक, धार्मिक, तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी काम केलेले आहे. वृषाली शिंदे या सन 2021 पासून गावच्या सरपंच पदावर काम करित आहेत.
गावातील विविध विकासकामे करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य मनिषा टाव्हरे, शुभांगी खालकर, प्रमिला गावडे, चंद्रकला गायकवाड, संगिता साबळे, हरिचंद्र शिंदे, अमोल वाळुंज, उपसरपंच दत्तात्रय लायगुडे, ग्रामसेविका शिला साबळे, अशोक लोखंडे, तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांचे व ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन विकासकामे करण्यात येत आहेत. राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांतून व मार्गदर्शनाखाली विकासकामे वेगात धावत आहेत.
प्रचंड जनसंपर्क, बोलण्यात स्पष्टता, अंगभूत चपळाई यासारख्या उपजत गुणांनी भरलेल्या सौ. वृषाली उत्तम शिंदे-पाटील या गावच्या माणसांच्या कठीण प्रसंगात नेहमीच धाव घेतात. या विशेष बाबी आजही तितक्याच बळ देणाऱ्या वाटतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेली जनसेवा गावच्या विकासात भर घालणारी आहे. राजकारणात विविध खेळी खेळल्या जातात. परिणामी बहुतांश गावचे राजकारण इतक्या खोलात जाते की, लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. वाद-विवाह,कलह भांडण-तंटे,सुडाच्या राजकारणातून पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या या पातळीवर गावचे राजकारण पोहोचते; मात्र त्यांनी कोणत्याही वाद-विवादाशिवाय केलेले यशस्वी राजकारण हे आजच्या तरुणांना प्रेरणा देणारे आहे.
योजनांचा पुरेपूर लाभ
नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे, यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 95 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. तसेच रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. स्मशानभूमी व दशक्रिया घाट सुशोभीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येणार आहे. ग्रामस्थांसाठी शासकीय पातळीवरील वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत.
शिक्षणाप्रती आस्था
शिक्षणाप्रती त्यांची असणारी आस्था ही गावच्या शैक्षणिक वातावरणाला पोषक ठरली. तर धर्माप्रति असणारी श्रद्धा आणि निष्ठा ही कधी परधर्मीयांना अन्यायकारक अथवा द्वेषात्मकतेचा प्रसंग त्यांनी कधीच उद्भवू दिला नाही. त्यामुळे त्यांच्या स्वच्छ राजकारणाचे प्रतिबिंब स्पष्ट होते. त्यांनी आपल्या जीवनात नेहमीच राजकारणात सक्रियता आणि अग्रक्रमता यात कुठलाही खंड पडू न देता ग्रामपंचायतीद्वारे जनतेची सेवाच करीत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व जतन ही काळाची गरज आहे. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे आज जगापुढे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत जागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
लोकसेवक म्हणून..
शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी आपण कृषी विभाग व शासनाच्या विविधांगी योजना गावात रबवण्यात येत असून त्या तळागाळातील जनतेपर्यंट पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत दिवसरात्र झटत आहे. एकूणच स्वच्छ, सुंदर, स्मार्ट वआदर्श गावाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही एक राजकारणी म्हणून नाही तर लोकसेवक म्हणून काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत, सामाजिक कार्य हाचआमचा मूळ पिंड असल्याने गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी गावकरी व मतदार निश्चित आम्हांला साथ देतील, असा ठाम विश्वास ग्रामपंचायतीच्या वतीने सौ. वृषाली उत्तम शिंदे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महिलांसाठी विविध विकासकामे
सरपंच वृषाली शिंदे यांनी महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध विकास योजना राबविण्यात येत आहे. विधवा महिलांना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे. यासाठी ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून एक आदर्श निर्माण केला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे, म्हणून विविध प्रकारचे व्यवसायिक प्रशिक्षण दिले गेले. यामध्ये महिलांना मसाले बनविण्याचे प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींना स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले आणि योगा शिबिरे घेण्यात आली. तसेच गावात नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात आली.
आगामी संकल्प
भविष्यात गावात सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय तसेच गावातील सर्व अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच वाड्यावस्त्यांवरील रस्त्यांचे मजबुतीकरण व रस्त्यावर पथदिवे बसवण्यात येणार आहे. तरुणांसाठी ओपन जिम तयार करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात येणार आहे. संपूर्ण गावाचा कायापालट करणार असल्याचा निश्चय सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
संकलन – लक्ष्मण ढोबळे, पारगाव शिंगवे