पुणे – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात शहरासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील चार दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धरणांमध्ये सध्या सुमारे 17.21 टीएमसी (60 टक्के) पाणीसाठा झाला आहे.
शहरातील आठवडयातील एक दिवस सुरू असलेली पाणीकपात रद्द करण्याबाबत जुलै अखेरीस आढावा घेऊन निर्णय घेतला जाणर असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. दरम्यान, खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांचा पाणीसाठा 17.21 टीएमसी झाला आहे. महापालिकेस शहरासाठी महिन्याला सव्वा टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. हे पाणी पुढील वर्षभर पुरेल एवढे आहे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.