वाझोली – प्रत्येकवर्षी मुसळधार पावसामुळे भुसस्खलन होवून एका नवीन गावाची भर त्यात पडत आहे. माळीण, तळीये, आंबेघर आणि आता इर्शाळवाडी भुसस्खलनामुळे आख्खी गावेच्या गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मुळात धोकादायक स्थितीत असलेल्या गावांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
22 जुलै 2021 रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने पाटण तालुक्यातील जितकरवाडी, जिंती या छोटयाशा वस्तीवर आलेले डोंगराचे संकट सुदैवाने टळले. त्यांच्यासोबतच शेजारील भातडेवाडी, सावंतवाडी येथील 93 लोकांचे स्थलांतर जिंती हायस्कूलमध्ये करण्यात आले. गतीवर्षी देखील काळजी म्हणून येथील लोकांना शाळेत स्थलांतरित केले. अशीच अवस्था काळगाव पासून 2-3 किमीवरील डोंगरात वसलेल्या जोशीवाडीची आहे.
10-12 घरे असलेल्या या छोट्या वस्तीत 50-60 लोक राहतात. दोन वर्षापूर्वी येथील घरांच्या पाठीमागे सुमारे 2 फूट तर, घरांपुढे साधारण 20 फुटाच्या अंतरावर मोठी चर पडली होती. त्यामुळे सुरक्षेसाठी येथील लोकाना करपेवाडी शाळेत ठेवले होते. यंदाही प्रशासन त्यांना सुचना देवून गेले आहे. त्यामुळे आमचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील बाधित लोकांनी केली आहे.