फलटण – भारतीय रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अलीकडेच अमृत भारत स्टेशन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फलटणचा समावेश व्हावा म्हणून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातत्याने रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. आज त्यास यश आले.
संबंधीत विभागाचे पत्र रेल्वे कार्यालयास दिले गेले. सध्या, या योजनेत भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी 1275 स्थानके घेण्याची कल्पना आहे. या योजनेअंतर्गत पुणे विभागातील फलटण स्थानकही निश्चित करण्यात आले. अमृत भारत स्टेशन प्लॅनमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा शाश्वत आधारावर विकास करण्याची कल्पना आहे.
यामध्ये स्थानकात प्रवेश, परिभ्रमण क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्कलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन “एक स्टेशन एक उत्पादन’ सारख्या योजनांद्वारे स्थानिक उत्पादनांसाठी कियॉस्क यांचा समावेश आहे. उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यावसायिक बैठकीसाठी नियुक्त जागा, लॅंडस्केपिंग इत्यादी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे.
या योजनेत इमारतीतील सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्टेशनचे एकत्रीकरण, मल्टीमॉडेल इंटिग्रेशन, दिव्यांग जनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, आवश्यकतेनुसार “रूफ प्लाझा’ देखील आहे. स्टेशनवर दीर्घकालीन सिटी सेंटर बांधण्याची कल्पना आहे. यासाठी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांनी 100 कोटी मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात 20 कोटी मंजूर केले आहेत. यामुळे खासदार रणजितसिंह यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे आभार मानले.