मुंबई – मणिपूर घटनेवर सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर राज्यातील भाजपाच्या एका आमदाराने टीका करत कोर्टालाच सुनावणारे ट्वीट केले. त्यानंतर सुप्रीम कोर्ट व सरन्यायाधीशांवर बोलण्याची या भाजपा आमदाराची हिम्मत ही सत्तेचा माज असल्याने झाली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. या प्रकरणी राज्यपाल व मा. सरन्यायाधीश यांना अवगत करु असेही पटोले म्हणाले आहेत.
मणिपूर तीन महिन्यापासून जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, फ्रान्सच्या दौऱ्यात व्यस्त होते तेथून देशात आले तर पक्षाचा प्रचार करण्यात मग्न राहिले. मणिपूरवर एक शब्दही त्यांनी काढला नाही. 78 दिवसानंतर पंतप्रधान मोदींनी मौन सोडत, “कोणालाही सोडणार नाही’ असे विधान केले. एवढे बोलण्यास त्यांना तीन महिने लागले.
सुप्रीम कोर्टाने मणिपूर प्रकरणाची दखल घेत सरकारने कारवाई करावी अन्यथा कोर्ट कारवाई करेल असे म्हटले होते, त्यांची चिंता स्वाभाविकच आहे. सरन्यायाधिशांच्या रास्त भूमिकेवर एक साधा भाजप आमदार टिका करतो. त्याच्यात ही हिंमत केवळ सत्तेच्या मस्तीमुळे आल्याचे दिसते, असेही पटोलेंनी अखेरीस म्हटले.