पुणे :- वाहतूकीचे उल्लंघन केल्यावर खटला दाखल झाल्यानंतर समंन्स बजावूनही हजर न रहाणाऱ्या वाहनचालकांवर न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात 732 वाहन चालकांना हे वॉरंट जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरीत वाहनचालकांना वॉरंट बजावले जाणार आहे. हे वॉरंट मोटर वाहन न्यायालयाकडून बजावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त(वाहतूक)विजय मगर यांनी दिली.
मगर यांनी दिलेल्या माहितीनूसार मोटार वाहन कायद्याअंतर्गत वाहतूक विभागाने सन 2020 पासून वाहतूक नियमांचे भंग केल्यानंतर तडजोड
खटल्याकरीता न्यायालयासमोर वेळोवेळी उपस्थित राहिले नाहीत अशा वाहनधारकांवर मोटार वाहन न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेले होते.
दाखल खटल्यांचे अनुषंगाने न्यायालयाने संबंधितांना वेळोवेळी कायदेशीर प्रक्रियाव्दारे समन्स पाठवले होते. तरीसुध्दा अद्यापपर्यंत संबंधीत वाहनधारकांनी वाहतूक विभागामध्ये अथवा न्यायालयाध्ये तडजोड केलेली नाही. या प्रकारच्या केसेस मोठया प्रमाणात न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत याकरीता न्यायालयाने अशा वाहनधारकांवर पकड/अटक वॉरंट जारी केलेले आहे.
मोटार वाहन न्यायालयाकडून पहिल्या टप्प्यामध्ये असे 732 वॉरंट वाहतूक विभागास सध्या प्राप्त झालेले आहेत. न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या पकड वॉरंट मधील संबंधित वाहनधारकांनी 8 दिवसांचे कालावधी मोटार वाहन न्यायालयात उपस्थित होवून खटल्यासंबंधी निकाल लावून घेणे गरजेचे आहे.
अन्यथा पोलीस विभागास संबंधितास पकड वॉरंटव्दारे अटक करुन न्यायालयासमोर हजर करावे लागणार आहे. तरी वाहनचालकांनी आपले वाहनावर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबाबत प्रलंबित असलेली तडजोड न्यायालयात त्वरीत प्रभावाने करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांना अटक टाळता येईल.