काटेवाडी परिसरातील शेतकरी आक्रमक
आंदोलन करून थेट काम बंद पाडले
काटेवाडी – या ठिकाण नीरा डाव्या कालव्याला सिमेंट (कॉंक्रेटीकरण) अस्तरीकरण करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याने काटेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठे आंदोलन करून हे काम बंद पाडले. आम्हा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही व हे काम त्वरित बंद करण्यात आले नाही तर रक्त सांडले तरी चालेल परंतु हे अस्तरीकरण (सिमेंट कॉंक्रिटीकरण) नीरा डाव्या कालव्याला होऊ देणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
काटेवाडी येथे बारामती मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय काटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, मिलिंद काटे, दत्तात्रय काटे, दिलीप काटे, रमेश काटे, शितल काटे, सतीश काटे, ऍडव्होकेट राजेंद्र मासाळ, दिलीप मासाळ, राजेंद्र सोलनकर, स्वप्निल काटे, जितेंद्र काटे, सूरज काटे, ऍड. रोहित काटे, यांसह परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नीरा डाव्या कालव्याला काटेवाडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेले अस्तरीकरण बंद करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकच पवित्र घेतला की आमचा प्रपंच हा केवळ शेती वरती अवलंबून असून आम्ही सध्या अडचणीत असताना शेतीवर आमची पुढील पिढी कशी जगणार व जर सध्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना नीरा डाव्या कालव्याला अस्तरीकरण (सिमेंट कॉंक्रिटीकरण) करण्याची काय गरज आहे.
सरकारमधील असलेले नेते म्हणत आहेत की, ज्या भागातील शेतकरी अस्तरीकरणाला विरोध करत असतील त्या भागातील अस्तरीकरण केले जाणार नाही. या भागामध्ये कायमस्वरूपी विरोध असताना हे नक्की कोणाच्या आदेशावरून कॉंक्रिटीकरण सुरू आहे. का केवळ ठेकेदाराला जगवण्यासाठी हे कॉंक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे का? असाही सवाल यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला. निरा डाव्या कालव्याच्या बाजूला सोमेश्वर साखर कारखाना, माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे. या भागात जर नीरा डावा कालव्याला अस्तरीकरण करण्यात आले तर कारखाने कसे चालतील व या कारखान्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था काय होईल याचा विचार सरकारने करावा.
ज्यावेळी दुष्काळ पडला होता त्याच्या अगोदर हा निरा डावा कालवा तयार करण्यात आला व नंतर धरण तयार झाले. 145 वर्षे झाले निरा डावा कालवा हा मुरुमीकरण केलेला आहे व त्याद्वारे शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी मिळाले आहे मग आत्ताच का गरज पडली अस्तरीकरण कॉंक्रिटीकरण करण्याचे. येथील शेतकऱ्यांच्या अडचणी करून खाली कोणाला पाणी न्यायचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधवांचा अंत पाहू नये, अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवली जाईल.
-शीतल काटे, शेतकरी काटेवाडी
पूर्वी वाडवडिलांनी आजोबांनी या कालव्यावर रोजगार हमी मध्ये काम करून हा कालाव तयार केला शेतीमालाला भाव नाही, विजेचा प्रश्न कायम भेडसावत आहे, धरणात पाणी नाही, पाऊस नाही, सध्या या भागातील शेतकरी कशीबशी ड्रीप वर शेती करत आहेत तेही शेतकऱ्यांना पाणी पिकासाठी पुरत नाही व त्यात भरीत भर म्हणून सरकारने हे निरा डाव्या कालव्याला अस्तरीकरण कॉंक्रिटीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी शेतकऱ्यांना कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी शेतकरी मागे हटणार नाही हे आमच्या हक्काचे पाणी आहे यासाठी याहीपेक्षा उग्र रूपाने आंदोलन केले जाईल. ज्याला नवीन पाणी पाहिजे आहे त्यासाठी नवीन धरणे बांधावी, नवीन कालवा तयार करावा परंतु आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही कायम लढा देणार आहे.
-रमेश काटे, शेतकरी काटेवाडी (ता. बारामती)