विजय लाड
कोयनानगर – कोयना नदीचे पाणी गढूळ झाल्याने कोयनावासियांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गत वर्षापासून कोयानावासीय गढूळ पाणी पीत आहेत. कोयना प्रकल्पाचा पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प कुचकामी ठरल्यामुळे याठिकाणी नवीन जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यासाठी तात्कालीन गृहराज्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 71 लाख रुपयांचा निधी दिला. परंतु, तरीही जलशुध्दीकरण प्रकल्प साकारला नाही. वर्षभरापासून कोयानावासीय गढूळ पाणी पीत असल्याने जिल्हा प्रशासनाला जाग कधी येणार? पालकमंत्री कोयनावासियांना किती दिवस गढूळाचे पाणी प्यायला भाग पाडणार? असा सवाल कोयनावासियांना भेडसावत आहे.
गत दोन वर्षांपूर्वी कोयना धरण अंतर्गत झालेल्या प्रचंड भुसल्खननामुळे कोयना धरणातील पाण्याचा रंग बदलला आहे. कोयना प्रकल्पाने थातुर-मातुर काम करुन काहीकाळ गढूळ पाणी शुध्द केले होते. यासाठी काही लाखांचा निधी पाण्यात घालवला. परंतु, गत तीन महिन्यांपासून पुन्हा ढूळ पाणी येत असल्याने कोयना प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाने डोक्याला हात लावला आहे. तीन महिन्यानंतर पाण्याचा अचानक रंग बदलण्यावरुन गदारोळ सुरु असून कोयनेच्या पाण्याला अकारण बदनाम व्हावे लागत आहे. कोयनानगर येथे तर पाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प कुचकामी ठरल्याने कोयनावासियांना शुध्द पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात भटकंती करावी लागत आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनाने कोयना धरणातील पाण्याची जागा गाळाने घेतली आहे.
कोयना प्रकल्पाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 2022 मध्ये तात्कालीन गृहराज्यमंत्री व विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 71 लाख रुपयांचा निधी देवून तातडीने सदरचे काम सुरु करून कोयनावासियांना शुध्द पाणीपुरवठा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. परंतु, गतवर्षीपासून हा निधी तसाच पडून आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे निर्देश आहेत.
जिल्हा नियोजन समितीकडून या कामासाठी लागणारा सर्व निधी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे देण्यात आला आहे. कोयना प्रकल्पाने नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी जागा सुध्दा दिली आहे. परंतु, त्यांच्याकडून का विलंबा झाला? याबाबत त्यांनी अद्याप काही कारण दिलेले नाही. मात्र, आता कोणतेही कारण न देता तात्काळ त्यांनी नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करून कोयनावासियांना शुध्द पाणीपुरवठा करावा, असा आदेश दिला आहे.
– शशिकांत माळी (जिल्हा नियोजन अधिकारी)