मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पॉवर प्ले खाते वाटपानंतर रंगणार आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री होताच शिंदे गटातील नेत्यांसह भाजप आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले या सर्व प्रकरणावरून खोचक टोला लगावला आहे.
अजित पवार यांचा निर्णय स्वागतार्ह असून शरद पवार यांनी माझं आणि अजितदादा यांचं ऐकलं असतं, तर फूट पडली नसती, असा खोचक टोला आठवले यांनी दिला. ते पुढे म्हणाले, अजित दादांचा गट प्रबळ असून मोठा देखील असल्याचे सांगत ‘कुणी काढली कळ, तर आमच्या सोबत आहे, छगन भुजबळ’ अशी मिश्किल शायरी देखील भुजबळांच्या एंट्रीवर केली आहे.
रामदास आठवले यांनी त्यांच्या खास अंदाजात पुढे म्हटले आहे की,’शरद पवार यांचा खरा वारसदार मी आहे’. शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांनी मंत्रीपदाची संधी दिली होती. त्यामुळे कुणीही कुणावर जास्त फार आरोप प्रत्यारोप करू नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला.