कोथरूड – चांदणी चौकातील दोन ते अडीच किलोमिटरचा वळसा पडतो म्हणून वाहनचालक लोहिया आयटी जैन पार्क येथील उताराच्या रस्त्यावरून विरूद्ध दिशेने जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. यामुळे समोरून वेगात आलेले वाहनचालक बिचकतात. काही बेजबाबदार चालकांच्या कसरतीमुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून हा “शॉर्टकट’ मृत्यूकडे नेणारा ठरू शकतो.
पौड रस्त्याने बावधनला जाणाऱ्या वाहनांना सध्या वेदभवन, एनडीए, मुळशी रोडवरून एनएचएआयच्या कार्यालयाजवळून यु-टर्न घेऊन उड्डाणपुलावरून बावधनला यावे लागते. हे अंतर जवळपास अडीच किलोमिटरचे आहे. त्यातच या मार्गावर वाहतूक कोंडीही असते. त्यामुळे काही वाहनचालक हा आटापिटा टाळण्यासाठी लोहिया आयटी जैन पार्क या कंपनीपासून रस्ता क्रॉस करून विरूद्ध दिशेने बावधनकडे जायला निघतात.
मात्र, हा रस्ता तीव्र उताराचा आहे. तसेच बावधन, मुळशी आणि राष्ट्रीय महामार्गावरून कोथरूडला येणारी सर्व वाहने या रस्त्याने खाली येतात. त्यामुळे वाहनांची वर्दळ अधिक असते, अशा स्थितीत काही बेजबाबदार वाहनचालक विरूध्द दिशेने जातात. चांदणी चौकात पोहचल्यावर सर्व वाहने महामार्गावर येतात. अधीच महामार्गावरील वाहनांची आणि प्रवाशांची गर्दी त्यात विरूध्द दिशेने आलेल्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने बिचकतात आणि वाहनांचा वेग मंदावतो. अनेकवेळा गाडीची धडक बसून किरकोळ अपघातही झाले आहेत.
“नो एन्ट्री’ बोर्ड…
लोहिया जैन आयडी पार्ककडून चांदणी चौकाच्या बाजूस विरूद्ध दिशेने जाण्यास सक्त मनाई आहे, असे बोर्डही लावले आहेत. मात्र, बोर्ड पाहूनही काही बेजबाबदार वाहनचालक विरूद्ध दिशेने जातात. त्यामध्ये तरूणांच्या रॅश ड्रायव्हींगमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
अति घाई संकटात नेई…
बावधनला जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसून उड्डाणपुलाचे काम झाल्यावर हा मार्ग खुला होईल. तोपर्यंत वाहनचालकांची अति घाई ही त्यांनाच संकटात घेऊन जाऊ शकते, याची कल्पना असूनही धोकादायक पद्धतीने वाहने चालवित आहे. एका चालकाची चुकी अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशा वाहनचालकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.