बालासोर – ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी झालेल्या तीन ट्रेनच्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातातील हा एक अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक झाल्याची माहिती समोर आली होती. पण ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी तीन गाड्यांचा समावेश असल्याचे सांगितले. बहनगा स्टेशनजवळ घडलेल्या या अपघातानंतर आतापर्यंत अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
बालासोर जिल्ह्यात 200 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत 207 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या भीषण अपघातानंतर भुवनेश्वर आणि कोलकाता येथून बचाव पथके आणि एनडीआरएफ, राज्य सरकारची पथके आणि हवाई दलही दुर्घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून बचाव कार्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत.
जखमींसाठी मी प्रार्थना करते
राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी ट्वीट करत म्हटले की, बालासोर, ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल जाणून घेऊन खूप दुःख झाले. माझे हृदय शोकाकुल कुटुंबियांसोबत. बचाव कार्य यशस्वी व्हावे आणि जखमी लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करते.
राहुल गांधींकडून ट्वीट
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून बालासोर, ओडिशा येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या दुःखद बातमीने दुःख झाल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी म्हणाले की, माझे हृदय शोकाकुल कुटुंबियांसोबत. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी. मी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विनंती करतो की त्यांनी बचाव कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे.
अपघात नेमका कशामुळे झाला?
कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाल्याचे समजते. सिग्नल यंत्रणेतील खराबीमुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे सांगितले जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडामार्गे ओडिशापर्यंत धावते.