दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत नव्या संसदेचे उद्घाटन होत आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण न दिल्याने विरोधकांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. या मुद्द्यावरून मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यातच आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) ‘सामना’ अग्रलेखातून मोदी सरकारसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय लिहिले ‘सामना’ अग्रलेखात ?
दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळयावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी यांनी फीत कापण्याचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न. संसद भवनाच्या उद्घाटन सोहळयावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला यावर भाजपचे लोक टीका करीत आहेत. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण ‘‘हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’’ असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे.
लोकशाहीत विरोधी पक्षांच्या भूमिकेस महत्त्व नसेल तर ती लोकशाही काय चाटायची आहे? राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख व देशाचे पहिले नागरिक असल्याने त्यांचा अपमान होऊ नये. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळयाचे निमंत्रण सर्व राजकीय पक्षांना देण्यात आले आहे. हे पक्ष आपापल्या मतांनुसार निर्णय घेतील, असे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले. याचा अर्थ कुणालाही आग्रहाचे, प्रेमाचे निमंत्रण नाही. हा आमचा कौटुंबिक सोहळा असून एक औपचारिकता म्हणून निमंत्रणे पाठवली आहेत, यायलाच हवे असा आग्रह नाही. म्हणजे नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळयाला खासगी कार्यक्रमाचेच स्वरूप आले.
ठाकरे गटाने उद्घाटन सोहळयावर बहिष्कार टाकला, पण उद्धव ठाकरे यांना बोलवतेच कोण? असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले. ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे. ज्या आडवाणींमुळे भाजपला आजचे ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले, त्यांना तरी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळयाचे निमंत्रण दिले काय? की त्यांनाही गेटवरच अडवले जाणार आहे ते आधी सांगा. जेथे देशाच्या राष्ट्रपतींनाच उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण नाही, तेथे तुम्हा-आम्हाला निमंत्रण असले किंवा नसले काय, काय फरक पडतोय?, असा सवालही सामनातून केला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयाचे दिमाखदार उद्घाटन झाले तसे नव्या संसद भवनाचे उद्घाटन होईल. संसदेत विरोधी पक्षनेत्याचे स्थान पंतप्रधानांच्या बरोबरीने असते. निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती, पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही, आलात तर अपमान करू, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे. संसदेच्या सर्वाधिकारी, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच आमंत्रण नाही तेथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडते. त्यांनी जायलाच हवे. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे काय तेवढे पहा, असा टोला देखील फडणवीसांना लगावला आहे.