भोपाळ – मध्य प्रदेशच्या बालघाट येथे बागेश्वर धामचे पीठाधीपती धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याचा कथेच्या आयोजनाला विरोध असल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठवले. मात्र याचिकेवरची सुनावणी सुरू असतानाच न्यायाधीश विवेक अग्रवाल याचिकाकर्त्याच्या वकीलावर चांगलेच भडकले आणि आता येथेच तुम्हाला तुरूंगात पाठवतो असे त्यांनी वकीलांना सुनावले.
बालाघाटातील लिंगा गाव येथे धीरेंद्र शास्त्रींच्या कथेचे आज आणि उद्या म्हणजे 23 आणि 24 रोजी आयोजन करण्यात आले आहे. सर्व आदिवासी समाज संस्थेने त्या विरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू असताना न्यायाधीश अग्रवाल याचिकाकर्त्यांच्या वकीलांना म्हणाले की आम्ही अगोदरच या प्रकारच्या याचिका फेटाळल्या आहेत.
आता ही याचिका काय किमतीत फेटाळू असा सवाल त्यांनी केला. तेंव्हा अगोदरची याचिका आणि यात फरक असल्याचे वकीलांनी सांगितले. त्यावर तुम्ही गेल्या याचिकेवर आम्ही काय आदेश दिला होता तो वाचला का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. तुमच्या आताच्या याचिकेचा आधारही तोच आहे. तुमच्या याचिकांसाठी जे स्पॉन्सर करत आहेत त्यांना तुम्ही जुना निकाल दाखवला नाही का? अशी विचारणा न्यायाधीशांनी केली.
त्यावर वकील म्हणाले की मागची याचिका ग्रामसभेच्या परवानगी विषयी होती. आता आमचा मुद्दा वेगळा आहे. जेथे कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे तेथे मोठे देवस्थान आहे आणि आदिवासींच्या अत्यंत श्रध्देचे ते स्थान आहे. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. जर त्या ठिकाणी कथेचे वाचन केले जात असेल तर त्यात कोणाच्या भावना दुखावण्याचा संबंध येतो कुठे असा प्रश्न न्यायाधीशांनी केला. जर तुम्ही म्हणत असाल की भावना दुखावल्या जात आहेत तर त्याला काही आधार असला पाहिजे. ज्यांनी तुमच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे त्यांनाच मी सांगतो की किमान असा वकील तरी द्या जो प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल असे न्यायाधीश म्हणाले.
या जागेऐवजी अन्यत्र कथा झाली तर त्याला आमचा विरोध नाही असे वकिलांनी न्यायाधीशांना सांगितले. त्यांच्या या विधानावर न्यायाधीश भडकले. तुम्हाला विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे द्या. कथा कुठे होणार आणि कुठे नाही हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. अगोदर श्रध्दा काय आहे आणि दुखावली कशामुळे जात आहे ते सांगा अशी विचारणा न्यायाधीशांनी केली.
घटनेत तरतूद आहे व तेच तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे असे नमूद करत वकील म्हणाले की मात्र तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. काहीही बोलत सुटलात. त्यांच्या या बोलण्यावर न्यायाधीश अधिकच भडकले. तुम्ही तुमचे नाव सांगा. तुमच्या विरोधात आताच अवमाननेची नोटीस पाठवतो. तुम्हाला बोलण्याची पध्दतच माहिती नाही.
वकीलही आपल्याच म्हणण्यावर ठाम राहीले आणि तुम्ही ऐकूनच घेत नसल्याचे त्यांनी न्यायाधीशांना पुन्हा सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे न्यायाधीश अग्रवाल इतके भडकले की आता काही उलट सुलट बोललात तर इथूनच तुरूंगात पाठवतो. सगळी वकीली संपून जाईल. अगाऊपणा करणे विसरून जाल. योग्य पध्दतीने बोलायला शिका असे त्यांनी सुनावले.
हे प्रकरण येथेच संपले नाही. न्यायाधीश वकीलांना उद्देशून पुढे म्हणाले की तुम्हा लोकांना पढवून येथे पाठवले जाते की न्यायालयात जाउन उध्दटपणा करा. आम्ही याचिका वाचूनच येतो आणि काय प्रश्न विचारायचे आहेत ते आम्हाला माहिती आहे. तुम्ही कधीपासून वकीली करत आहात? तुम्हाला उच्च न्यायालयात कशी वकीली केले जाते कोणी शिकवले नाही का?