भोपाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी देशातील काही जणांनी विविध लोकांना सुपारी दिली आहे. त्यासाठी काही लोक देशात बसून; तर काही देशाबाहेर राहून सक्रिय झाले आहेत, असे त्यांनी म्हटले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच ब्रिटनचा दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी भारतातील लोकशाहीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. अलिकडेच मानहानीच्या खटल्यात शिक्षा ठोठावण्यात आल्याने राहुल यांची खासदारकी रद्द झाली. त्याची दखल घेतली असल्याचे जर्मनीने म्हटले. त्यावरून भारतातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे निमंत्रण कॉंग्रेस परकी शक्तींना देत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.
त्याशिवाय, शैक्षणिक पदवीवरून मोदींना घेरण्याचे सत्र आपने अवलंबले आहे. त्या पार्श्वभूमीवर, मध्यप्रदेशातील कार्यक्रमात बोलताना मोदींनी विरोधकांवर शाब्दिक तोफ डागली. अर्थात, त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही.
माझी प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. मात्र, गरीब, मध्यमवर्ग, आदिवासी, दलित, मागासवर्ग यांच्या रूपाने प्रत्येक भारतीय माझे सुरक्षाकवच बनला आहे. त्यामुळे माझी प्रतिमा मलिन करू इच्छिणारे आणखीच अस्वस्थ बनून नवनव्या युक्त्या योजत आहेत, असे मोदी म्हणाले.
केंद्रातील मागील सरकारे मतपेढीवर डोळा ठेऊन लांगूलचालनात व्यस्त होती. त्याउलट, आमचे सरकार जनतेच्या समाधानासाठी कार्यरत आहे. मागील सरकारे एका परिवाराला देशाचा प्रथम परिवार मानत होते. त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष केले, अशा शब्दांत त्यांनी नामोल्लेख टाळून कॉंग्रेस आणि गांधी परिवाराला लक्ष्य केले.