मुंबई – सरकार मंगळवारी रंगाची होळी खेळत होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या पीकांची होळी होत होती, अशा शब्दात आमदार छगन भुजबळ साहेब यांनी सरकारवर हल्लाबोल करत विधानसभेत नाराजी व्यक्त केली. सरकार यावर ताबडतोब काय पावले उचलणार आहे हे सांगितले पाहिजे. शेतकरी कर्ज कसे फेडणार? असा सवालही छगन भुजबळ यांनी यावेळी केला.
गेले तीन दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी छगन भुजबळ यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आणि याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचे म्हणणे मांडणार असल्याचे सभागृहाला सांगितले.
दरम्यान, याआधी महाविकास आघाडीच्या आमदारांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे झालेच पाहिजेत…अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे… जाहीर करा, जाहीर करा शेतकऱ्यांना भरपाई जाहीर करा… मंत्री तुपाशी शेतकरी उपाशी… नुकसान भरपाई जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.