म्हसवड – माझ्यावर कितीही आघात झाले, कितीही संकटे आली तरी सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे त्यातुन मी सहिसलामत बाहेर आलो. एवढ्या मोठ्या अपघातातूनही मी केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे व त्यांच्या प्रेमामुळेच मी वाचलो. माझा हा नवीन जन्म झाला असून यापुढे हा जन्म मी माझ्या माण- खटावच्या जनतेला अर्पण करुन येथील इंच न इंच जमीन ओलिताखाली आणण्यासाठी खर्ची घालू. जोवर हा जयकुमार गोरे येथे आहे तोवर माण- खटावचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही, अशी ग्वाही आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
कृतज्ञता सोहळा तथा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होत. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सोनिया गोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, पालिका मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, सुरेश म्हेत्रे, विजय धट, नितीन दोशी, डॉ. वसंत मासाळ, सौ. वैशाली लोखंडे, सुनील पोरे, बाळासाहेब मासाळ, बाळासाहेब विरकर, शंकर विरकर, मारुती विरकर, बबन अबदागिरे, लुनेश विरकर, बाळासाहेब पिसे, आप्पासाहेब पुकळे आदी प्रमुख उपस्थित होते. म्हसवड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडुन 79.11 कोटी रुपयांचा निधी तर विविध विकासकामांसाठी 10 कोटी रुपयाचा निधी आ. गोरे यांनी मंजूर केल्याबद्दल म्हसवडकरांनी आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात आ. गोरे म्हणाले, “” गतवेळी झालेल्या पालिका निवडणुकीत म्हसवडकरांनी सत्ताबदल केला. तो आपण स्वीकारत पाच वर्ष पालिकेत पाऊल न ठेवण्याचा निश्चय केला होता.
पाच वर्ष पूर्ण झाली. म्हसवडकर जनतेनेच आता आत्मपरीक्षण करावे. आम्ही पालिकेची सत्ता सोडताना पालिका फंडात 18 कोटी रुपये शिल्लक होते. त्यातून 1 रुपयाचे विकासकाम या सत्ताधाऱ्यांना करता आले नाही. याऊलट आम्ही उभारलेल्या विकासकामांची साधी देखभाल यांना करता आली नाही. पालिकेत आमची सत्ता होती तेव्हा माणमध्ये भयानक असा दुष्काळ पडला होता त्या काळातही आम्ही शहराला किमान तिसऱ्या दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या सत्ताधाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पाणी मुबलक असतानासुध्दा तो 10 ते 12 दिवसांवर गेला ही खरी म्हसवडकरांची शोकांतिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवाजी शिंदे, विजय सिन्हा, विजय धट, नितीन दोशी, डॉ. वसंत मासाळ, शंकर विरकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
कॉरिडॉर प्रकल्प होणारच
म्हसवड शहरात मंजूर असलेला कॉरिडॉर प्रकल्प हा इतरत्र गेल्याचा कांगावा करुन आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या गड्यांनी हा प्रकल्प घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रामराजेंच्या विरोधात का निदर्शने केली नाहीत. प्रकल्प पळवणारे हेच अन आंदोलन करणारे पण हेच. पण हा जयकुमार गोरे आहे तोवर हा प्रकल्प कोठेही जाणार नाही. या प्रकल्पामुळे माण-खटावच्या सुमारे 50 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
आ. गोरेंच्या सत्कारासाठी 200 किलोंचा हार
म्हसवड शहरासाठी सुमारे 90 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणाऱ्या आ. गोरेंचा नागरी सत्कार करण्यासाठी म्हसवडकरांनी 200 किलो वजनाचा महाहार आणला होता. तो हार एका क्रेनच्या साह्याने आ. गोरे यांना सपत्नीक घालण्यात आला. हे दृष्य टिपण्यासाठी हजारो तरुणांनी गर्दी केली तर एवढा मोठा हार हा म्हसवडच्या इतिहासात कधीच कोणाला घालण्यात आला नसल्याने हे नयनरम्य दृष्य हजारोंनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केले. म्हसवडकरांनी कार्यक्रमस्थळी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी केली.