प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेले, कुसुमाग्रज या टोपण नावाने साहित्य निर्मिती केलेले, साहित्य क्षेत्रातील एक उत्तुंग नाव. त्यांनी मराठी साहित्यात नुसती मोलाची भर घातली असे नव्हे तर “नटसम्राट’सारखे नाटक आणि “कणा’सारखी कविता हे जणू दोन तेजमान हिरेच त्यांनी वाचकांच्या हाती दिले, ज्यांचे तेज आणि रुची अजूनही कमी झालेली नाही.
नटसम्राटमध्ये तर इतकं चिरंतन, काळाच्या पुढचं, मध्यमवर्गीय जीवनाचं विदारक चित्र, अभिनय क्षेत्रातील हळवी बाजू, पती-पत्नीमधील उतार वयातील माया, प्रेम, नातवंडांची ओढ, प्रत्यक्ष पोटच्या मुलांची स्वार्थी वृत्ती आणि कुणा एका अनोळखी माणसाची शेवटची साथ… काय काय दाखवलं नाही या नाटकाने. अशी अजरामर रचना करून “कणा’सारख्या कवितेत कवींनी सार संपल्यावरही पुढे जाण्याची जिद्द आणि ताठ असलेला कणा दाखविताना, मानवी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींनी खचून न जाता लढण्याची जिद्द
दिली.
समाजामध्ये आपल्या वाङ्मयाने काहीतरी उद्बोधक संदेश देणाऱ्या या साहित्यिकाचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेवर ज्यांचे प्रेम आहे, जिच्यासाठी ते अहोरात्र जगले, त्या भाषेत अलौकिक अशी साहित्य संपदा निर्माण केली त्यांची ही एक छोटीशी अर्थपूर्ण कविता-
पाचोळा
आडवाटेला दूर एक माळ
तरू त्या वरती एकला विशाल
आणि त्याच्या बिलगुनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपित जीवनासी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातुनी ओतू द्या निखारा
मूक सारे साहे तो बिचारा
तरू वरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ही गवत ते मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनात
येई धावत चोफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेई उडवीत त्या दूर दूर कोठे
आणि जागा ही मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतुनी पर्णराशी
या कवितेतदेखील कवींनी मानवी जीवनाचे अंतिम सत्य सांगितले आहे. एका उजाड माळरानावर एका मोठ्या वृक्षाची पाने गळून पाचोळा तयार झाला आहे. दिवस रात्र पुढे जात आहे, सृष्टीचक्र चालू आहे, पण पाचोळ्याकडे कुणाचेही लक्ष नाही. झाडावरती डोलणारी पाने पाचोळ्याकडे बघून हसत आहेत, तर जाणारे येणारे त्याला तुडवून पुढे जात आहेत. अतिशय दुर्लक्षित असा तो निपचित पडून आहे. पण एके दिवशी इतका जोरात वारा येतो, जणू वादळ येते आणि तो पाचोळा उडून जातो. झाडाखालची जागा रिकामी होते. पण पुन्हा पाने पडू लागतात आणि पाचोळा साठू लागतो.
जीवनचक्राचं अतिशय हृद्य वर्णन नेमक्या शब्दात कवींनी मांडले आहे. वयोवृद्ध झाल्यानंतर तरुण लोकांना त्यांच्यासाठी वेळ नसतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. पाचोळ्याप्रमाणे ते नुसतेच ते पडून राहतात आणि मग एके दिवशी दूरच्या प्रवासाला जातात. पण तरुण पिढीला तेव्हा हे कळत नाही की आपणही असंच खाली पर्ण राशीत पडणार आहोत. कधी तरी आपणही म्हातारे होणार आहोत. हे जीवनाचं अंतिम सत्य आहे; पण तारुण्याच्या प्रवाही जीवनात त्यांना ते उमगत नाही.
मानवी जीवनाकडे बघण्याची कवींची दृष्टी अतिशय संवेदनशील आहे. नटसम्राट, पाचोळा यामध्ये वृद्धत्वाविषयी त्यांनी सखोल विचार मांडला आहे. यावरून त्यांची सामाजिक जाणीव किती प्रगल्भ होती ते दिसते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आजही चालू आहेत. असे थोर साहित्यिक हे सामान्य माणसांच्या आयुष्यात नंदादीपासारखे कार्य करतात. ज्याच्या प्रकाशात आपल्या जीवनाची वाट उजळून निघते.
– आरती मोने